मास्कचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:36+5:302021-07-11T04:21:36+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात काही प्रमाणावर कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. कोरोना कमी ...

मास्कचा विसर
रत्नागिरी : जिल्ह्यात काही प्रमाणावर कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. कोरोना कमी होऊ लागला आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात कोरोना जाणार, या भ्रमात असलेल्यांकडून आता सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर कमी होऊ लागल्याचे दिसत आहे.
लसीकरणात गोंधळ
रत्नागिरी : जिल्ह्यात आता १८ ते ४४ या वयोगटासाठीही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या वयोगटाला पहिला डोस दिला जात आहे. मात्र, ज्यांचे पहिले डोस घेऊन जवळजवळ तीन महिने उलटत आले आहेत तरीसुद्धा अशांना रजिस्ट्रेशन करुनही कोरोना लस मिळेनाशी झाली आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेकडूनही योग्य नियोजन केले जात नाही.
कर्मचाऱ्यांची गैरसोय
रत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे बाल कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. परंतु, या सेंटरमध्ये एकच मोठा हॉल असून, कर्मचाऱ्यांनादेखील सतत या रुग्णांसोबत राहावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना बाथरुम व्यवस्था, भोजन तसेच नाश्त्यासाठीदेखील स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्वेक्षणाला वेग
मंडणगड : कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या अनुषंगाने तालुक्यात सहव्याधी असलेल्या मुलांचे सर्वेक्षण सुरु आहे. दि. १२ जुलैपर्यंत हा अहवाल पूर्ण करुन पाठवला जाणार आहे. शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे अंगणवाडी सेविकांकडून तर ६ ते १६ वयोगटातील मुलांचे प्राथमिक शिक्षक सर्वेक्षण करणार आहेत.
रॉकेलची टंचाई
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात रॉकेलची अवैधरित्या विक्री होत आहे. परंतु, ग्रामीण भागातील जनतेला मात्र रॉकेल दुरापास्त झाले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढू लागल्याने शेतीच्या कामांना अडचण निर्माण होत असतानाच आता ग्रामीण भागातील जनतेला रॉकेलही मिळविणे अवघड झाले आहे.
मोकाट जनावरांचा त्रास
देवरुख : शहरासह आजूबाजूच्या परिसरात मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला आहे. बाजारपेठेतही ही जनावरे ठिय्या मारुन बसलेली असतात. या जनावरांचा भाजी विक्रेते, फळ विक्रेते, व्यापाऱ्यांना अधिक त्रास होत आहे. नगर पंचायतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
वकिलांसाठी लसीकरण
खेड : येथील वकील तसेच न्यायालयीन कर्मचारी यांंच्यासाठी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रयत्नाने लसीकरण करण्यात आले. ही मोहीम फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्रशासनामार्फत राबविण्यात आली. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे अॅड. हेमंत वडके, अॅड. कौस्तुभ खेडेकर तसेच न्यायालयाचे लिपिक सतीश चव्हाण, तुकाराम काष्टे यांनी आभार मानले.
मार्ग निवाऱ्याची दुरुस्ती
रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये गावातील मार्ग निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. भाट्ये समुद्रकिनाऱ्याकडे जाण्यासाठी रस्त्यावर असलेला एस. टी.चा मार्ग निवारा पूर्णपणे अस्वच्छ झाला आहे. हा निवारा पूर्णपणे झाडीने व्यापला आहे. झरीविनायकच्या पुढील मार्ग निवाराही नादुरुस्त आहे.
लसीकरणाला प्रतिसाद
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लसीकरण नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. वैद्यकिय अधिकारी डॉ. यादव आणि डॉ. धने यांनी योग्य नियोजन केले होते.
पावसाची प्रतीक्षा
राजापूर : पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून काहीशी पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतीच्या कामाचा खोळंबा झाला आहे. हवामान खात्याने ९ जुलैपासून जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु अजूनही ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. शेतीची कामे थांबल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत आहे.