जिल्ह्यातील मुलींचा प्रथमच राज्यात झेंडा

By Admin | Updated: October 16, 2015 22:48 IST2015-10-16T21:04:30+5:302015-10-16T22:48:12+5:30

राज्यस्तरीय खो - खो स्पर्धा : पंधरा वर्षानंतर रत्नागिरीला उपविजेतेपद

Flags in the state for the first time in the district | जिल्ह्यातील मुलींचा प्रथमच राज्यात झेंडा

जिल्ह्यातील मुलींचा प्रथमच राज्यात झेंडा

रत्नागिरी : राज्य खो-खो असोसिएशन आणि सातारा जिल्हा अ‍ॅमेच्युअर खो - खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण (जि. सातारा) येथे झालेल्या राज्यस्तरीय खो - खो स्पर्धेत रत्नागिरीच्या संघाने प्रथमच अंतिम सामन्यात प्रवेश केला. ठाण्याबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात त्यांना चार गुणांनी पराभव पत्कारावा लागला. गेल्या पंधरा वर्षात प्रथमच जिल्ह्यातील मुलींनी राज्यात रत्नागिरीचा झेंडा फडकवला आहे.महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याचा संघ राष्ट्रीय खेळाडूंनी भरलेला होता. तर दुसरीकडे रत्नागिरीच्या संघात ऐश्वर्या सावंत, आरती कांबळे, अपेक्षा सुतार, श्रध्दा लाड यांचा समावेश होता. अंतिम सामना चुरशीचा झाला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतने २.३० मि., ३.२० मि. आणि आरती कांबळेने १.३० मि., १.५० मि. खेळ करत ठाण्याच्या संघाला जेरीस आणले. श्रध्दा लाडने उत्कृष्ट खांब मारत दोन गडी टिपले. ठाण्याच्या बलाढ्य संघाला अंतिम सामन्यात विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र, ठाण्याच्या अनुभवी संघापुढे रत्नागिरीच्या मुलींना पराभव पत्करावा लागला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतला सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरवण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही बलाढ्य उस्मानाबाद संघाला रत्नागिरीने १ गुण व २ मिनिटे राखून पराभूत केले. रत्नागिरीने नाणेफेक जिंकून संरक्षण घेतले. मध्यंतराला रत्नागिरीकडे ३ गुणांची आघाडी होती. ऐश्वर्या सावंतने २ मि. व २.१० मि. खेळ, आरती कांबळेने २.३० मि., १.४० मि., तन्वी कांबळेने २.३० मि. नाबाद आणि ०.३० मि. आणि दोन गडी बाद केले. तर अपेक्षा सुतारने २ मि., १.१० मि. आणि श्रध्दा लाडने १.३० व ३ गडी बाद केले. त्यांच्या आक्रमक खेळामुळे हा सामना रत्नागिरीने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्य असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी संघाला संदीप तावडे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय खेळाडू पंकज चवंडे हे या संघाचे प्रशिक्षक असून, विनोद मयेकर व्यवस्थापक आहेत. या विजयानंतर रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी माजी आमदार बाळ माने, प्रसन्न आंबुलकर, असोसिएशनचे अध्यक्ष नाना मयेकर, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, बाळा मयेकर, समीर काबदुले, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)


गेली पंचवीस वर्षे विवेक पंडित, कै. दिगंबर नाचणकर आणि मी खो-खोची मुहूर्तमेढ रोवली. त्याला असंख्य लोकांचे हातभार लागले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हा खेळ टिकवून ठेवण्याची धडपड होती. सुरवातीला एकतरी राष्ट्रीय खेळाडू झाला पाहिजे, अशी इच्छा होती. मात्र, गेल्या पंधरा वर्षात असंख्य राष्ट्रीय खेळाडू तयार झाले. मात्र, संघ म्हणून जिंकण्याची इच्छा फलटण येथील राज्य स्पर्धेतील अंतिम सामन्यातील भरारीतून पूर्ण झाली. अशीच घौडदौड कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिल, अशी प्रतिक्रिया राज्य खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे सचिव संदीप तावडे यांनी व्यक्त केली.

Web Title: Flags in the state for the first time in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.