साडेपाच हजार प्रस्ताव निकाली
By Admin | Updated: July 16, 2015 22:55 IST2015-07-16T22:55:55+5:302015-07-16T22:55:55+5:30
प्रमोद जाधव : जातपडताळणी प्रमाणपत्र वितरणात सुसुत्रता

साडेपाच हजार प्रस्ताव निकाली
रत्नागिरी : रत्नागिरी येथील विभागीय जातपडताळणी कार्यालयाकडून जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणात आता सुसूत्रता येत असून, येथील कारभार गतिमान झाला आहे. जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांमध्ये ५ हजार ७२८ प्रस्ताव निकाली काढण्यात आल्याची माहिती समाजकल्याण उपायुक्त प्रमोद जाधव यांनी दिली.
रत्नागिरीतील कुवारबाव येथे विभागीय जात पडताळणी कार्यालय सुरु करण्यात आले. कार्यालय सुरु होऊनही रिक्त पदांमुळे दाखल होणाऱ्या प्रस्तावांचा निपटारा होण्यात अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थी, शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव प्रलंबित होते. येथील कारभारामध्ये सुसूत्रता नसल्याने जात पडताळणी वेळेवर होण्याचे प्रमाणही नगण्य होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून येथील कारभाराला गती येण्यासाठी जात पडताळणी समिती स्तरावर प्रयत्न करण्यात आला.
या कार्यालयाचा कारभार गतिमान होऊन प्रमाणपपत्रांचे वितरणही सुरळीत होण्यास मदत झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. या कार्यालयाने जानेवारी ते डिसेंबर २०१४ या वर्षभरामध्ये तब्बल २१ हजार ९७९ प्रकरणे मार्गी काढून प्रलंबित प्रकरणे कमी केली आहे. जानेवारी ते जून २०१५ या ६ महिन्यामध्ये ५ हजार ७२८ प्रस्तावांची छाननी पूर्ण करुन प्रस्ताव निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. अजूनही ४ हजार ४३१ प्रस्ताव छाननी स्तरावर प्रलंबित असल्याचे जाधव यांनी सांगितले.
दरम्यान गेल्या सहा महिन्यात जातपडताळणी कार्यालयाने कारभारात सुसुत्रता आणतानाच वेगाने काम सुरु केल्याने प्रमाणपत्रांची प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय व करावी लागणारी प्रतिक्षा आता दूर होणार आहे. (वार्ताहर)
जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत अनेक वर्षाचे प्रलंबित २१९७९ प्रस्ताव निकाली काढण्यात आले. जानेवारी ते जून २०१५ या ६ महिन्यांत ५७२८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.