प्रतिष्ठेसाठी दिग्गज प्रचाराच्या आखाड्यात
By Admin | Updated: October 24, 2015 00:54 IST2015-10-23T21:16:46+5:302015-10-24T00:54:25+5:30
पालिका पोटनिवडणूक : केवळ चार जागांसाठी शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री मैदानात

प्रतिष्ठेसाठी दिग्गज प्रचाराच्या आखाड्यात
मनोज मुळ्ये -- रत्नागिरी येथील नगर परिषदेच्या चार जागांची पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. उमेश शेट्ये यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे दोन्ही पक्षांनी प्रचारावर चांगलाच भर दिला आहे. त्यासाठी आमदारांसोबतच माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्षही प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत.रत्नागिरीतील राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीत स्वतंत्र गट करून शिवसेनेला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या चार नगरसेवकांच्या अपात्रतेची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. या अर्जावर सुनावणी देताना जिल्हाधिकारी यांनी चारही नगरसेवकांना अपात्र ठरवले. या नगरसेवकांनी न्यायालयाकडे अपात्रतेविरोधात दाद मागितली. मात्र, त्यांचे अपील फेटाळण्यात आले आणि जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम राहिला.
या चार जागांसाठी १ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. एका नगर परिषदेच्या केवळ चार जागा निवडून दिल्या जाणार असल्या तरी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या उमेश शेट्ये यांनी पुन्हा स्वगृही प्रवेश केला आहे. या एकाच मुद्द्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. सर्वच पक्षांनी ती प्रतिष्ठेची केली आहे.
राजापूरचे आमदार राजन साळवी आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत गेले काही दिवस घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. दोन्ही आमदार आपापली कार्यकर्त्यांची फळी घेऊन मैदानात उतरले आहेत. सध्या सगळीकडे हीच चर्चेची बाब झाली आहे. इतकेच नाही तर खासदार विनायक राऊत यांनीही या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले आहे.
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी पालकमंत्री भास्कर जाधव हेही प्रचारात सहभागी होणार आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीलाही आतापर्यंत कधी महत्त्व मिळाले नव्हते, इतके महत्त्व या चार जागांसाठीच्या पोटनिवडणुकीला मिळाले आहे. गतवेळी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हीच मंडळी आपल्या प्रचारासाठी फिरली नसल्याचा आक्षेप त्यांच्याच पक्षातील काही उमेदवारांनी घेतला होता. मात्र आता पोटनिवडणुकीसाठी ही मंडळी पुढे सरसावली आहेत. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर शिवसेनेकडून कोण येणार, हे मात्र अजून जाहीर झालेले नाही. (प्रतिनिधी)
उमेश शेट्येंची प्रतिष्ठा महत्त्वाकांक्षी प्रवासासाठी
शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे उमेश शेट्ये यांना ही निवडणूक जिंकणे गरजेचे झाले आहे. पक्षांतर केल्यानंतर पराभव झाल्यास त्यांना राजकारणात मोठा धक्का बसेल. उमेश शेट्ये यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत आणि त्या आजवर कधीही लपून राहिलेल्या नाहीत. नगराध्यक्षपद आणि नंतर त्या माध्यमातून आमदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा अनेकदा पुढे आली आहे. शिवसेनेतील त्यांचा प्रवेश याच मुद्द्यावर झालेला असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधानसभेचा त्यांचा मार्ग बंद झाला. त्यामुळेच त्यांनी परतीचे पाऊल उचलले. आता राष्ट्रवादीत आपले बस्तान बसवण्यासाठी त्यांना ही निवडणूक स्वत: जिंकणे गरजेचे आहेच, शिवाय आपल्या सुनबाई आणि अन्य उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक अटीअटीची किंबहुना पुढील मार्ग मोकळे करण्यासाठी महत्त्वाची आहे.
शेट्येंचा पराभव हीच शिवसेनेची प्रतिष्ठा
उमेश शेट्ये यांनी शिवसेना सोडली असल्यामुळे ते निवडून आले तर शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे शेट्येंना पराभूत करणे हे आता शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचे झाले आहे. त्यामुळेच रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी जातीनिशी मैदानात उतरले आहेत. गेल्या नगर परिषद निवडणुकीत या दोन्ही आमदारांनी प्रचारासाठी इतका मोठा सहभाग घेतला नव्हता. मात्र, या निवडणुकीत दोन्ही आमदार आपली सर्व टीम घेऊन मैदानात उतरले आहेत.
‘एकला चलो’ म्हणून भाजपचीही परीक्षाच
जागा वाटपाबाबत योग्य चर्चा झाली नाही, अशी भूमिका घेत शिवसेना आणि भाजप या निवडणुकीतही एकत्र आले नाहीत. जागा वाटप हे वरवर दाखवले जाणारे कारण आहे. विधानसभा निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर रूंदावतच गेली आहे. राज्यस्तरावर दोन्ही पक्ष एकत्र आले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यात विशेषत: रत्नागिरी तालुका आणि शहरात हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाही. एकटेच जाण्याची भूमिका घेतल्यामुळे भाजपला या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. उमेश शेट्येंना हरवण्यासाठी शिवसेना आणि स्वबळ दाखवण्यासाठी राष्ट्रवादी यांच्यामधील साठमारीत आपली डाळ शिजण्याची भाजपला आशा आहे.
प्रदेशाध्यक्ष येणार : २९ला रत्नागिरीत प्रचारफेरी
चार जागांची निवडणूक होत असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी पालकमंत्री भास्कर जाधव २९ आॅक्टोबरला रत्नागिरीमध्ये येत आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री असल्यापासून सुनील तटकरे यांचे उमेश शेट्ये यांच्याशी सख्य आहे. त्यामुळेच उमेश शेट्ये यांना परत आणण्यात सुनील तटकरे यशस्वी झाले किंवा सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे उमेश शेट्ये यांनी हा प्रवेश केला. त्यामुळेच तटकरे २९ रोजी रत्नागिरीत प्रचारासाठी येत आहेत.
धडपड स्वत:साठी
या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीनही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, यात प्रत्येकाची धडपड स्वत:साठीच आहे. शिवसेना-भाजपची फिस्कटलेली युती आणि उमेश शेट्ये यांचे पक्षांतर यामुळेच ही निवडणूक गाजत आहे.