साहित्य संमेलनाची पर्वणी

By Admin | Updated: October 16, 2015 22:48 IST2015-10-16T21:01:58+5:302015-10-16T22:48:27+5:30

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजन

The Festival of Literature Convention | साहित्य संमेलनाची पर्वणी

साहित्य संमेलनाची पर्वणी

खालगाव : कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी आणि कवी केशवसूत स्मारक, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १८ आॅक्टोबर २०१५ रोजी रत्नागिरी येथील स्वयंवर हॉल, जुना माळनाका येथे जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरीतील साहित्यप्रेमींना साहित्यांची मेजवानी मिळणार आहे. या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत तर संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे हे असणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचे हस्ते होणार आहे. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, रत्नागिरी तालुक्याचे आमदार उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, उर्मिला पवार, अरुण म्हात्रे तर विशेष अतिथी माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, अरुण नेरुरकर, कार्याध्यक्षा नमिता कीर आदी उपस्थित राहणार आहेत.या संमेलनातील ठळक कार्यक्रम पुढीलप्रमाणे - सकाळी ८ ते ९.१५ वा. साहित्य दिंडी, मारूती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते स्वयंवर हॉल या मार्गावरून येणार आहे. सकाळी १० ते १२ परिसंवाद - कोकणातील बोली, अध्यक्षा उर्मिला पवार, सहभाग आनंद बोंद्रे, मिलींद पेडणेकर, प्रा. बाळासाहेब लबडे, प्रा. निधी पटवर्धन, जॉनी रावत, दुपारी १ ते २ भोजन, दुपारी २ ते ३ परिसंवाद - साहित्य आणि आजचा युवक, अध्यक्ष प्रा. जयश्री बर्वे, यांच्यासह चिन्मयी मटांगे, रेणुका भडभडे, यशोमती करंदीकर, गौरी सावंत, ओंकार मुळ्ये, वेदवती मसुरकर सहभागी होणार आहेत.सायंकाळी ३ ते ३.४५ नाट्य लेखक प्र. लं. मयेकर यांना आदरांजली. (प्र. लं. च्या नाटकातील निवडक व्यक्तिरेखा) यामध्ये प्रा. प्रदीप शिवगण, श्रीकांत पाटील, राजेश गोसावी आणि कीर कला अकादमीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ३.४५ ते ४.४५ परिसंवाद - साहित्यातले कोकण अध्यक्ष डॉ. विद्याधर करंदीकर, सहभाग प्रा. श्रीकृ ष्ण जोशी, प्रा. वर्षा फाटक, प्रा. ज्ञानदा असोलकर, प्रा. श्रद्धा राणे, सायंकाळी ४.४५ ते ५.२० काव्य मैफल सहभाग रामदास फुटाणे, अरूण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर, प्रा. अशोक बागवे, सायंकाळी ५.२० ते ६.२० वा. कवी संमेलन, अध्यक्ष अरुण म्हात्रे, सहभाग जिल्ह्यातील आठ शाखांमधील काव्य स्पर्धेतून यशस्वी झालेले एकूण सत्तावीस कवी, सायंकाळी ६.२० ते ६.३० समारोप अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मान्यवर साहित्यिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, साहित्यप्रेमी व काव्यप्रेमी नागरिकांनी या संमेलनाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा साहित्य संमेलन प्रमुख व मालगुंड गावचे सुपुत्र गजानन तथा आबा पाटील, कवी केशवसूत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब राजवाडकर, कोमसापचे रत्नागिरी शाखा अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई, कोमसापचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश खटावकर यांनी केले आहे. (वार्ताहर)

साहित्याची मेजवानी : अशोक नायगावकर यांची उपस्थिती
कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी आणि कवी केशवसूत स्मारक, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने साहित्यप्रेमींना मेजवानी मिळणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून खासदार विनायक राऊत तर संमेलनाध्यक्ष म्हणून रामदास फुटाणे असणार आहेत. यावेळी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने कवी अशोक नायगावकर यांच्या खुमासदार कवितांचा रत्नागिरीतील साहित्यप्रेमींसह रत्नागिरीकरांना आस्वाद घेता येणार आहे.


उपस्थितीची साशंकता
कोकण मराठी साहित्य परिषदेने ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात रत्नागिरीत साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमी किती संख्येने उपस्थित राहतील याबाबत साशंकता आहे.

Web Title: The Festival of Literature Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.