प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:21+5:302021-07-17T04:25:21+5:30
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना ...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. कोरोनामुळे विविध भागांत शासकीय निर्बंध लागू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा कालावधी प्राप्त व्हावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी दि.२३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत भात व नागली पिकांचा समावेश करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे येणारे महापूर, चक्री वादळे, कापणीवेळी मुसळधार पाऊस त्यामुळे कापणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हातभार लागावा यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी ही योजना राबवीत असताना दि.१५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध भागांत असलेले निर्बंध विचारात घेता शेतकऱ्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.