महामार्गावर वाहनचालकांची तपासणी करावी : जयंद्रथ खताते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:31 AM2021-04-10T04:31:15+5:302021-04-10T04:31:15+5:30
चिपळूण : दोन दिवसांपूर्वी कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात दोन मोठ्या वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातातील ट्रक थोडक्यात खोल दरीत कोसळताना ...
चिपळूण : दोन दिवसांपूर्वी कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात दोन मोठ्या वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातातील ट्रक थोडक्यात खोल दरीत कोसळताना वाचला. यावेळी वाहन चालविणारे चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसले. मद्यपान करून गाडी चालविण्यामुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्यामुुळे शिरगाव पोलीस नाका आणि कुंभार्ली घाटातील चेकपोस्ट येथे वाहन चालविणाऱ्या चालकांची तपासणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
कऱ्हाड - चिपळूण तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नियमितपणे वाहनांची वर्दळ असते. दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करीत असतात. कायद्याने वाहन चालविताना मद्यपान करणे हा गुन्हा आहे. चिपळूण-कऱ्हाड मार्गावर गेल्या काही महिन्यांत वारंवार अपघात झालेले आहे. त्यातच या मार्गावरील कुंभार्ली हा धोकादायक आहे. मद्यपान करून वाहन चालविताना दुसऱ्या वाहनांना अधिक धोका संभवतो. कुंभार्ली घाटापूर्वी शिरगाव येथे पोलीस स्थानक आहे. शिवाय कुंभार्ली घाटात पोलीस चेकपोस्ट आहे. या दोन्ही ठिकाणी वाहनचालकांची तपासणी केल्यास मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होईल.
शिरगाव व कुंभार्ली घाटातील चेकपोस्ट येथे वाहनचालकांची कसून तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी तपासणी सुरू झाल्यास मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी काही प्रमाणात अपघात कमी होण्यास मदत होईल. अन्यथा नियमित अपघाताच्या घटना सुरू राहण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष खताते यांनी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याकडे केली आहे.