जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; पाणी भरणे, जमीन खचणे, दरड कोसळणे आदी प्रकारांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:08+5:302021-07-20T04:22:08+5:30
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपायला सुरूवात केली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी ...

जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; पाणी भरणे, जमीन खचणे, दरड कोसळणे आदी प्रकारांमध्ये वाढ
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपायला सुरूवात केली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी भरणे, जमीन खचणे, दरड कोसळणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत एकूण पावसाची नोंद तब्बल ११७८.९० (सरासरी १३०.९९) मिलिमीटर झाली आहे. सर्वाधिक पाऊस दापोलीत १८३.९० मिलिमीटर तर सर्वात कमी संगमेश्वर तालुक्यात ९७.९० मिलिमीटर इतका झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील अनेक भागांमध्ये पाणी भरण्याच्या घटना घडल्या. दापोलीखालोखाल मंडणगड १४६.६०, गुहागर १४४.२० राजापूर १३६.४०, रत्नागिरी १२७.४०, लांजा १२३, खेड ११५.९, चिपळूण १०४. ३० इतका पाऊस झाला आहे. या पावसाने जिल्ह्याला गारठवून टाकले आहे. सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यात दाभोळ येथील काशिनाथ जोशी यांच्या घराशेजारी दरड कोसळल्याने घराचे अंशत: २२ हजार रुपयांचे नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यात धामापूर येथे १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (३३) व चेतन सुरेश सागवेकर (१८) हे नदीवर पोहायला गेले असता, नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला.
रत्नागिरी तालुक्यात गोळप येथे जमीन खचल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून तीन कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. या ठिकाणाला तहसीलदार शशिकांत जाधव यांनी भेट दिली. पावस, टेंभ्ये तसेच परिसरातील अन्य गावांमध्येही पाणी साचण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले.
राजापूर शहराला पुराचा वेढा कायम आहे. तालुक्यातील नाटे येथील ठाकरेवाडीजवळील साकव पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास केवळ पाच - दहा मिनिटे सूर्यदर्शन झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाळी वातावरण कायम होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार, असे वाटत होते.