गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेसाठी डिजिटल बोर्ड

By Admin | Updated: October 14, 2015 00:03 IST2015-10-13T21:00:58+5:302015-10-14T00:03:39+5:30

भारतातील अनेक समुद्रकिनारे मी पाहिले आहेत. यामध्ये गुहागरचा समुद्रकिनारा धोकादायक नाही, येथे पाण्याला उतार नाही,

Digital board for guarding the guhagar beach | गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेसाठी डिजिटल बोर्ड

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेसाठी डिजिटल बोर्ड

गुहागर : समुद्राच्या भरती - ओहोटीची वेळ बदलती असल्याने गुहागर समुद्र किनाऱ्यावर डिजिटल बोर्डद्वारे वेळ सूचित करण्यासाठी पुढील काळात डिजिटल बोर्ड बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ही माहिती प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी दिली.
गुहागर समुद्रकिनारी येणारे पर्यटक अतिउत्साहाने समुद्र स्नानासाठी उतरतात. मात्र, खोल पाण्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू होतो. हे प्रकार रोखण्यासाठी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी गुहागरमध्ये निमंत्रितांची विशेष बैठक घेऊन त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर चर्चा केली.
यावेळी हजारे म्हणाले की, भारतातील अनेक समुद्रकिनारे मी पाहिले आहेत. यामध्ये गुहागरचा समुद्रकिनारा धोकादायक नाही, येथे पाण्याला उतार नाही, असे माझे मत आहे. येणारे पर्यटक हे अतिउत्साहाच्या भरात खोलवर पाण्यामध्ये जातात. समुद्राच्या भरती - ओहोटीच्या वेळी पाण्यामधील होणाऱ्या बदलाबाबत पर्यटक अनभिज्ञ असतात. अशावेळी पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे.
यावेळी निसर्गाशी मस्ती करु नका, अशा आशयाचे फलक लावावेत, अशी सूचना राजन दळी यांनी केली. यावर नगरपंचायत व बंदर विभागामार्फत समुद्रकिनाऱ्यावरील प्रवेशाचा भाग व जेटीवर फलक लावणे तसेच हे फलक आकर्षक व एकाच रंगाचे असावेत, असे सुचवण्यात आले.
नगरपंचायतीतर्फे सुरक्षेसाठी ४० लाईफ जॅकेट देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी जाहीर केले. आॅक्टोबर ते जून या कालावधीत पर्यटकांसाठी स्पीडबोट सेवा सुरू असते. मागील दोन वर्षात या कालावधीमध्ये बुडणाऱ्या पर्यटकांना वेळीच पोहोचून बाहेर काढण्याने अनेकांचे जीव वाचल्याचे व्यवस्थापक मयुरेश साखरकर यांनी सांगितले. पुढील काळात एकही अपघात होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
जेटीजवळील भागात पाण्याचा प्रवाह बदलून व खोलवर पाण्यात गेल्याने पर्यटक प्राणास मुकले आहेत. ेअशावेळी जेटीजवळील काही मीटर भाग हा निषिद्ध क्षेत्र करावा तसेच एक विशिष्ट जागा ठरवून येथील प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
सागरी सुरक्षारक्षक तसेच यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना वेगळी ओळखपत्र देता येतील, असे पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. गहागरला सुरक्षित पर्यटन करुया, असे आवाहन शेवटी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष जयदेव मोरे, सभापती राजेश बेंडल, तहसीलदार वैशाली पाटील, अ‍ॅड. संकेत साळवी, राजन दळी, राजेंद्र आरेकर, नरेश पवार, श्यामकांत खातू, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, गटविकास अधिकारी बी. ई. साठे, बंदर विभागाचे अभिजीत गोळे यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

गोवा तसेच इतर समुद्री पर्यटन भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक समुद्रात डुंबत असताना येथे कायम सुरक्षा रक्षक देखरेख करत असतात. किती पाण्यात जावे, कुठे पोहू नये अशा प्रकारच्या सूचना करत असल्याने येथे अपघात होत नाहीत अशा प्रकारची सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली. यावर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी नगरपंचायत कंत्राटी सुरक्षारक्षकनेमण्याबाबत पुढाकार घेईल, असे सांगितले.

Web Title: Digital board for guarding the guhagar beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.