निधीअभावी विकासकामे रखडली
By Admin | Updated: November 23, 2015 00:29 IST2015-11-22T21:39:51+5:302015-11-23T00:29:22+5:30
चिपळूण : दलवाई यांंच्याकडून आढावा

निधीअभावी विकासकामे रखडली
चिपळूण : संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हुसेन दलवाई यांनी दत्तक घेतलेल्या रामपूर गावच्या विकासकामांचा आढावा खासदार दलवाई यांनी शनिवारी पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात घेतला. यावेळी सभापती स्नेहा मेस्त्री उपस्थित होत्या. नवनिर्वाचीत सभापतींचा सत्कार खासदार दलवाई यांनी केला. निधी अभावी रामपूर गावातील विकासकामे रखडल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत खासदार दलवाई यांनी रामपूर गाव दत्तक घेतले आहे. त्यानंतर दलवाई यांच्या गावात आठ सभा झाल्या. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्वेक्षण करुन गावचा विकास आराखडा तयार करण्यात आला. परंतु, निधीअभावी या गावची विकासकामे रखडली आहेत. हा निधी जिल्हा नियोजन किंवा जिल्हा परिषदेकडून मिळणे अपेक्षीत आहे. त्यासाठी पंचायत समितीकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. रामपूर गावचा १२ कोटींचा विकास आराखडा असून, पंचायत समिती स्तरावरील कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत. या बैठकीला उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, तहसीलदार वृषाली पाटील, गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. रामपूर गावची विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु, असे खासदार दलवाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नाराजी : महावितरणचे अधिकारी अनुपस्थित
संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील ‘रामपूर’ हे गाव खासदार हुसेन दलवाई यांनी दत्तक घेतले आहे. यासंदर्भात विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला महावितरणचे अधिकारी गैरहजर होते. महावितरणचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रस्ताव सादर
चिपळूण तालुक्यातील रामपूर गावच्या विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात आले असूनही अद्याप निधीच प्रतीक्षा आहे.