Deputy CM Eknath Shinde News: कोकणच्या मातीवर, पाण्यावर आणि जनतेच्या श्वासावर घाला घालणाऱ्या प्रदूषणकारी उद्योगांविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट रणशिंग फुंकले. चिपळूण तालुक्यातील खेड येथील लोटे परशुराम एमआयडीसीत इटलीतून हद्दपार करण्यात आलेली मितेनी कंपनी अप्रत्यक्षपणे ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ या नावाने कार्यरत आहे. अशा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोकणात थारा देणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आणि स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
विकासाच्या नावाखाली कोकणचा निसर्ग आणि लोकांचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या शक्तींविरोधात सरकार कठोरात कठोर भूमिका घेईल, असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित जनसभेला एकनाथ शिंदे संबोधित करत होते. सभेच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अकाली निधनावर श्रद्धांजली अर्पण केली. ही केवळ उमेदवारांची नाही, तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही निवडणूक विकासाच्या भवितव्याचा फैसला करणारी आहे, असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांनी कोकणावर भरभरून प्रेम केले
शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिची नाळ कोकणात पुरलेली आहे. बाळासाहेबांनी कोकणावर भरभरून प्रेम केले. कोकणानेही शिवसेनेवर तेवढेच प्रेम केले, असे सांगत त्यांनी नारळी-पोफळी, आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय आणि निसर्गसंपन्न कोकणाच्या विकासाची गरज अधोरेखित केली. पक्षाचा खरा कणा हा कार्यकर्ता आहे. या पक्षात कोणी मालक नाही, कुणी नोकर नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि संपूर्ण पक्षाचा डोलारा हा कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे, असा थेट संदेश त्यांनी दिला. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, ही योजना कधीही बंद होणार नाही. या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या नावावर पैसे काढण्याचा अधिकार मिळाला, समाजात सन्मान वाढला आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला झाला, असे त्यांनी सांगितले.
कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टरप्लॅन मांडला
कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विकासाचा मास्टरप्लॅन मांडला. मुंबई ते अलिबाग ते सिंधुदुर्ग-गोवा असा ग्रीनफिल्ड रस्ता, कोकण विकास प्राधिकरण, काजू, आंबा आणि मत्स्य व्यवसायाला चालना, ३० लाख कोटींचे उद्योग करार, रस्ते आणि रेल्वेला प्राधान्य, तसेच पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण या सर्व बाबी त्यांनी सविस्तर मांडल्या. मितेनी - लक्ष्मी ऑरगॅनिक या प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांबाबत बोलताना त्यांनी लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे आणि जे कारखाने लोकांच्या आरोग्याला घातक ठरतील त्यांना सरकार कधीही पाठीशी घालणार नाही, असे स्पष्ट केले. चिपळूण तालुक्यातील भूस्खलनग्रस्त भागांसाठी संरक्षण भिंत उभारण्याचा आणि कळवंडे धरणाच्या दुरुस्तीचा ठाम शब्द देत त्यांनी लोकजीवन धोक्यात येऊ देणार नाही, ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगितले.
दरम्यान, छोट्या शेतकऱ्यांनाही न्याय दिला जाईल आणि शेतकऱ्यांना सरकार कधीही सोडणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी दिला. शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सरकारी कार्यालयांचे फेरे थांबले असून जवळपास पाच कोटी लोकांपर्यंत सेवा पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. राजकारणात शब्दाला किंमत असते, असा ठाम संदेश देत त्यांनी आपली त्रिसूत्री मांडली. उपलब्धता, साधेपणा आणि विश्वासार्हता. शब्द दिला की तो पाळणे हीच माझी ओळख आहे, असे त्यांनी सांगितले.
Web Summary : DCM Shinde vows to block polluting industries in Konkan, prioritizing public health. He promised Konkan's comprehensive development with infrastructure projects, support for local businesses, and assured continued assistance to farmers and women through government schemes.
Web Summary : डीसीएम शिंदे ने कोंकण में प्रदूषणकारी उद्योगों को रोकने और सार्वजनिक स्वास्थ्य को प्राथमिकता देने का संकल्प लिया। उन्होंने बुनियादी ढांचा परियोजनाओं, स्थानीय व्यवसायों के लिए समर्थन और सरकारी योजनाओं के माध्यम से किसानों व महिलाओं को निरंतर सहायता का आश्वासन दिया।