कलमरोपांची मागणी घटली
By Admin | Updated: July 11, 2014 00:03 IST2014-07-10T23:57:08+5:302014-07-11T00:03:52+5:30
पाऊस न पडल्याने परिस्थिती

कलमरोपांची मागणी घटली
शिवाजी गोरे - दापोली, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावर लाखो कलमांची निर्मिती केली जाते. विद्यापीठाने निर्माण केलेल्या कलमांना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतु कोकणवगळता राज्यातील अन्य भागात पाऊस न पडल्याने कलमरोपांची मागणी घटली आहे. विद्यापीठाने निर्माण केलेल्या रोपांपैकी केवळ ४० टक्के कलमांची विक्री झाली असून, गेल्या १० वर्षांत जूनपर्यंत सर्वांत कमी मागणी यंदा झाली आहे. मे महिन्यात घाटमाथ्यावर गेलेली कलमेसुद्धा पावसाअभावी करपली असल्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ला, कुडाळ, मुळदे, फोंडाघाट, लांजा, के. व्ही. के. लांजा, शिरगाव, भाट्ये, आवाशी, वाकवली, टेटवली, रुखी, आसोंड, श्रीवर्धन, रोपोली, दापोली, रोहा, के. व्ही. के. रोहा पालघर या संशोधन केंद्रांमध्ये कलमांची रोपे निर्माण करुन विक्री केली जाते. कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातील कलमांना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दरवर्षी विद्यापीठाने निर्माण केलेली कलमे व शेतकऱ्यांची मागणी पाहता दरवर्षी शेतकऱ्यांना कलमे अपुरी पडतात. विद्यापीठ शेतकऱ्याची मागणी पूर्ण करु शकत नाही.
विद्यापीठाकडून दरवर्षी सुमारे २० ते २५ लाख कलमांची रोपे तयार केली जातात. मात्र, त्यातूनही शेतकऱ्यांची गरज पूर्ण होत नसल्याने काही शेतकऱ्यांना खासगी नर्सरीमधून कलमे घेण्याची वेळ येते. परंतु यंदा परिस्थिती अगदी उलट आहे. कारण यावर्षी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जून महिना कोरडा गेल्याने या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. जनावरे व माणसांना प्यायला पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कलमे नेऊन लावणार कुठे. कलमांना पाणी कुठून टाकणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असल्याने यावर्षी शेतकऱ्यानी जून महिन्यात कलमांची उचल कमी प्रमाणात केली आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कलमांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दरवर्षी मे - जून महिन्यात सर्वच संशोधन केंद्रातील कलमांची रोपे संपतात. गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातील कलमांची ४० टक्के विक्री झाली आहे. संशोधन केंद्रात कलमे शिल्लक राहिली तर त्याच्या संगोपनाचा खर्चही वाढणार आहे.
वर्षनिहाय उत्पादन
वर्षआंबाकाजू नारळचिकूआवळाकोकम
२००८-०९२,००,०००४,१०,०००८२,०००२२,०००२८,०००४२,०००
२००९-१०२,३०,०००४,४०,०००८०,०००२०,०००३०,०००६४,०००
२०१०-११२,४१,०००४,११,०००८२,०००१२,०००१२,०००२५,०००
२०११-१२२,६१,०००४,३१,०००८५,०००१२,०००१२,०००२५,०००
२०१२-१३३,२७,०००४,००,०००९९,०००२२,०००१९,०००१०,०००
२०१३-१४ ६० टक्के शिल्लक