रिफायनरीविरोधात ‘दे दणादण’ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:57 IST2017-09-09T22:54:48+5:302017-09-09T22:57:43+5:30
राजापूर : राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी दूर ठेवत नाणार - सागवे परिसरातील शेतकरी, बागायतदार व मच्छीमार बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवत

रिफायनरीविरोधात ‘दे दणादण’ मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी दूर ठेवत नाणार - सागवे परिसरातील शेतकरी, बागायतदार व मच्छीमार बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवत रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील राजीव गांधी क्रीडांगणापासून तहसील कार्यालयापर्यंत चालत आलेल्या मोर्चेकºयांच्या घोषणांनी राजापूर दणाणून गेले. कोकणच्या मुळावर उठणारा हा विनाशकारी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे, या मुख्य मागणीचे निवेदन मोर्चेकºयांनी प्रांताधिकारी अभय करगुटकर व तहसीलदार प्रतिभा वराळे यांना दिले.
केंद्र व राज्य शासनाची भागीदारी असणारा सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प तालुक्यातील सागवे-नाणार परिसरात मंजूर झाला असून, त्यासाठी १५ हजार एकर जागा आवश्यक आहे.
याच परिसरात अणुऊर्जा प्रकल्पही होत आहे. विविध आंदोलनाद्वारे गेले काही दिवस त्याचे पडसाद उमटत होते. तरीही शासन लक्ष देत नसल्याने अखेर हा मोर्चा काढण्यात आला. आपली ताकद सरकारला दाखवण्याचा निर्धार करून सागवे - नाणार परिसरातील चौदा गावच्या जनतेने थेट प्रांत आणि तहसील कार्यालयांवरच धडक दिली.
शनिवारी सकाळी प्रकल्प परिसरातील लोक प्रथम डोंगर फाट्यावर जमा झाले. प्रत्येक गावातून ट्रक, दुचाकीस्वारांसह विविध वाहनांतून मोर्चेकरी गोळा होत गेले. शहरातील वरची पेठ परिसरातील राजीव गांधी मैदानावर सर्वजण एकत्र झाले. राजीव गांधी मैदानासह तहसील कार्यालय या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती जगताप परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवून होते. राजीव गांधी मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यापूर्वी झालेल्या आंदोलनात विविध पक्षीय राजकीय मंडळी व लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. पण, ते केवळ शरीरानेच होते. मनाने त्यांचा सहभाग नव्हता. त्यामुळे अनेक आंदोलने यशस्वी होऊ शकली नव्हती.
अशा राजकीय मंडळींना सोबत घेतले तर हे आंदोलनही फसेल व आपले नुकसान होईल, असा विचार करुन या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. ‘जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची...! कोकणात फिरायला याल तर मासे, भात देऊ व जमीन विकत घ्यायला आलात तर याच मातीत गाडू’ असा इशारा देणारे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. राजीव गांधी मैदानापासून निघालेला मोर्चा काही वेळाने तहसील कार्यालयापाशी पोहोचला. तेथे मोर्चेकºयांना थांबवण्यात आले. प्रांताधिकारी अभय करगुटकर हे तहसील कार्यालयात उपस्थित होते.
तहसील कार्यालयाबाहेर प्रचंड पोलीस फौज तैनात ठेवण्यात आली होती. बॅरीकेट्सही लावण्यात आले होते.
सुरुवातीला केवळ सात जणांनाच आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. नंतर सागवेच्या जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर, माजी सभापती कमलाकर कदम, अशोक वालम, मज्जीद भाटकर, सलमान सोलकर, अजिम बोरकर, विनोद पेडणेकर, साकीद मुजावर, साहील सोलकर, अब्दुल्ला सोलकर आदींचा आत सोडण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व करणाºया मंडळींनी रिफायनरी प्रकल्पाविरुध्द जोरदार टीका केली. हा प्रकल्पच रद्द झाला पाहिजे. त्यासाठी मोर्चा काढला आहे. शासनाने आमच्या भावनांचा विचार केला नाही तर हा प्रकल्प रद्द होत नाही तोवर सनदशीर मार्गाने आमची आंदोलने अशीच चालू राहतील असा इशारा दिला.
राजकीय पक्षांचे पुढारी व पक्षविरहीत मोर्चाला उदंड प्रतिसाद लाभला. यापूर्वीच्या रिफायनरी विरोधी आंदोलनात सहभागी असलेल्या सेनेकडून जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर, माजी सभापती कमलाकर कदम व काही कार्यकर्तेवगळता कुणीही उपस्थित नव्हते. प्रकल्पातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने तुम्हीसुध्दा विचार करा, अशी सूचना करणाºया प्रांताधिकारी अभय करगुटकर यांना आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी खडे बोल सुनावले.