ऊर्जा प्रकल्पातच दाटला काळोख

By Admin | Updated: December 5, 2014 23:33 IST2014-12-05T22:45:45+5:302014-12-05T23:33:26+5:30

रत्नागिरी पालिका : तीन पेट्रो; दोन पवन ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित

Dark energy in power project | ऊर्जा प्रकल्पातच दाटला काळोख

ऊर्जा प्रकल्पातच दाटला काळोख

प्रकाश वराडकर - -- रत्नागिरी शहरात पालिकेतर्फे स्वत:चे तीन हायड्रो व दोन पवन चक्की सुमारे २५ कोटी खर्चाचे ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचे ठराव पालिकेतर्फे शासनाला पाच वर्षांपूर्वीच सादर करण्यात आले. या प्रकल्पांद्वारे रत्नागिरी पालिका विजेबाबत स्वयंपूर्ण होऊन पालिकेचा दरवर्षीचा विजेवर होणारा साडेचार कोटींपेक्षा अधिक खर्च वाचणार आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांच्या काळात नेटाने पाठपुरावा न झाल्याने हे प्रकल्प होणार की बारगळणार, असा सवाल निर्माण झाला आहे.
रत्नागिरी शहर विजेबाबत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी २००९मध्ये पाठपुरावा करण्यात आला होता. त्याद्वारे पालिकेच्या पथदीप व इमारतीत लागणाऱ्या विजेची निर्मिती शक्य असून, दरवर्षी विजेवर होणारा साडेचार कोटींचा खर्च वाचविणे पालिकेला या प्रकल्पांमुळे शक्य होणार आहे. या प्रस्तावामागील उद्देश चांगला आहे. मात्र, त्यासाठी ज्या नेटाने सत्ताधाऱ्यांनी पाठपुरावा करायला हवा होता तो अद्यापही होताना दिसून येत नाही. त्यामुळेच या होऊ घातलेल्या ऊर्जा प्रकल्पांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऊर्जा निर्मितीचे प्रत्येकी १०० किलोवॅट वीजनिर्मितीक्षम हे तीन हायड्रो प्रोजेक्ट रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ, पानवल धरणांवर तसेच नाचणे तलावावर उभारण्याचा प्रस्ताव २००९मध्येच तयार करण्यात आला आहे.
तसे ठराव करून ते शासनाकडेही पाठविण्यात आले आहेत. या प्रकल्पांसाठी सुजल योजना व शासनाच्या अन्य योजनांतून निधीची उपलब्धता होणार आहे. मात्र, या प्रकल्पांच्या आराखड्यासाठी व प्रकल्प उभारणीबाबतच्या आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी एजन्सीच अद्याप नियुक्त झालेली नाही.
शीळ व पानवल धरणावरील या हायड्रो प्रोजेक्ट उभारणीसाठी पाहणी झाल्यानंतर तेथे हे प्रकल्प यशस्वी होऊ शकतात, असे तज्ज्ञांच्या पाहणीनंतर स्पष्ट करण्यात आले आहे. भगवती मंदिर परिसरातील किल्ला परिसरात उंच भागात दोन पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. प्रत्येकी २ किलोवॅट विजेची निर्मिती या पवन ऊर्जा प्रकल्पांतून होऊ शकते.
या प्रत्येक प्रोजेक्टसाठी ५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे पालिकेची विजेची सध्याची गरज पूर्ण होऊ शकते. नगराध्यक्षपदी मिलिंद कीर असताना या प्रकल्पाचा काही प्रमाणात पाठपुरावा झाला होता. त्यानंतर पुन्हा या प्रकल्पांबाबतची स्थिती जैसे थे आहे.

पाठपुराव्याअभावी प्रकल्प बारगळणार?
साडेचार कोटींचे वीजबिल वाचणार!
शीळ धरणावरून रत्नागिरी शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा होेतो. प्रतिदिन या धरणातून शहराला किमान १० दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा होतो. हे पाणी खेचण्यासाठी ३०० व २५० अश्वशक्तीचे पाच विद्युत पंप वापरले जातात. पानवल धरणातील पाणी गुरुत्वबलावर शहरात पुरविले जाते. मात्र, शीळ धरणातून पाणी लिफ्ट करण्यासाठी दरमहा १६ ते २० लाख एवढे वीजबिल येते. पालिकेच्या इमारतीत, कार्यालयात व शहरातील चार हजार पथदिव्यांसाठी मिळून आणखी १५ ते २० लाखांचे वीजबिल भरावे लागते. त्यामुळे विजेवरील पालिकेचा वर्षाचा खर्च हा साडेचार कोटींपर्यंत जातो. त्यामुळेच पालिकेला वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी हे पाचही ऊर्जा निर्मिती प्रकल्प महत्त्वाचे आहेत.


विजेच्या बिलात बचत करण्यासाठी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी अलिकडेच रत्नागिरी शहरातील पथदीप एलइडीयुक्त करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. त्यातील पायलट प्रोजेक्ट थिबा रोडवर महिनाभरापूर्वीच राबविण्यात आला आहे. विजेचे बिल कमी यावे, यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न चांगला आहे. मात्र, त्यांनी या पाचही ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी नेटाने पाठपुरावा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Dark energy in power project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.