जीविताला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:26+5:302021-07-17T04:25:26+5:30

खेड : शहरात प्रमुख रस्ते खोदून महावितरण कंपनीने अंडरग्राउंड केबल अर्धवट स्थितीत रस्त्याच्या कडेलाच टाकली आहे. मात्र, ठेकेदार गायब ...

Danger to life | जीविताला धोका

जीविताला धोका

खेड : शहरात प्रमुख रस्ते खोदून महावितरण कंपनीने अंडरग्राउंड केबल अर्धवट स्थितीत रस्त्याच्या कडेलाच टाकली आहे. मात्र, ठेकेदार गायब झाला आहे. या केबलमुळे नागरिक तसेच जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोरोना चाचणीला विलंब

रत्नागिरी : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. परंतु या चाचण्यांचे अहवाल मिळण्यासाठी विलंब होत आहे. चाचण्या करणारे अहवाल येईपर्यंत घरात थांबून न राहता इतरत्र फिरत राहतात. त्यामुळे त्यांच्याकडून कोरोनाचा संसर्ग सर्वत्र फैलावत आहे. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे.

भात लावणीला वेग

सावर्डे : चिपळूण तालुक्यात शेतीची कामे आता वेगात होऊ लागली आहेत. योग्यवेळी पेरणी केल्याने रोपांची योग्य वाढ झाली आहे. त्यामुळे भात लावणीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. सुरुवातीचा पाऊस चांगला झाल्याने ८ ते १० दिवसांतच रोपे तरारून आली असून, लावणी उरकण्यासाठी शेतकरी घाई करीत आहेत.

अशोकवनाची स्थापना

दापोली : निवेदिता प्रतिष्ठान आणि सरस्वती विद्यामंदिर जालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्यामंदिर येथे अशोकवनाची स्थापना करण्यात येणार आहे. झुडुपवर्गीय झाडांपासून वनौषधींची लागवड विद्यामंदिराच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. अशोक परांजपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

औषधी वनस्पतींची लागवड

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. औषधी वनस्पतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी तसेच मानवी जीवनातील त्यांचे महत्त्व लक्षात यावे या हेतूने दरवर्षी औषधी वनस्पतींची६ लागवड करण्यात आली आहे.

इमारत खचली

खेड : शहरातील मटण - मच्छी मार्केटच्या नदीपलीकडील इमारतीच्या बाजूचा भाग मोठ्या प्रमाणावर खचला असल्याने मटण व मच्छी विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांमध्येही मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे. या मार्केटमध्ये विक्रेत्यांचे १७ गाळे आहेत. पावसाने कधीही हानी पोहोचू शकते.

रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा

दापोली : दापोली - खेड मार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या मार्गावरील अपघात वाढले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

डांबरी रस्ता खचला

दापोली : तालुक्यात रविवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे वावघर गावातील भागणेवाडीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची रस्त्याअभावी मोठीच गैरसोय होत आहे. पावसाळ्यात ही गैरसोय अधिक जाणवणार आहे.

दुकानांमध्ये गर्दी कायम

चिपळूण : सध्या लाॅकडाऊनचे नियम शिथिल झाल्याचे दिसताच नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता काही दुकाने सुरू झाल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन होत नसल्याचे दिसत आहे.

निर्बंध हटविण्याची प्रतीक्षा

रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध सुरू झाले आहेत. त्यामुळे दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने आतातरी जिल्हा तिसऱ्या स्तरात येईल का, अशी प्रतीक्षा सुरू झाली आहे. तसेच काही दुकाने अजूनही सुरू नसल्याने या व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Web Title: Danger to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.