कोरोनामुळे कलाकारांना करावा लागतोय संकटांचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:31+5:302021-04-24T04:31:31+5:30
रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. विविध यंत्रणांवर याचा परिणाम झाला आहे. ...

कोरोनामुळे कलाकारांना करावा लागतोय संकटांचा सामना
रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. विविध यंत्रणांवर याचा परिणाम झाला आहे. रंगभूमी क्षेत्रालाही याचा फटका बसला असून रंगमंचावरच उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
लॉकडाऊनमध्ये टीव्ही आणि मोबाईल वगळता मनोरंजनाची सर्वच साधने बंद आहेत. चित्रपटगृहे, नाट्यगृहांना टाळे लावण्यात आले आहे. गतवर्षीही लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. यावर्षी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असल्यामुळे लॉकडाऊन शासनाला जाहीर करावे लागले. सद्यस्थितीत लॉकडाऊन लवकर संपणे अशक्य आहे, शिवाय संपले तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे नाट्यगृहे लवकर खुली होणे अशक्य आहे. अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक केवळ नाटकांवर निर्भर आहेत. या सर्वांच्याच उपजीविकेला खीळ बसली आहे. काही कलाकारांनी आधीच्या बचतीवर गतवर्षी संकटावर काही प्रमाणात मात केली होती. मात्र गतवर्षी जानेवारीपासून कार्यक्रम सुरू झाले. जेमतेम दोन ते अडीच महिनेच कलाकारांना काम मिळाले. ज्या कलाकारांचा पूर्णवेळ नाटक किंवा कलेवर उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्यांच्यापुढे खरा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊननंतरही व्यवसाय रुळावर यायला बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे हा पाच ते सहा महिन्यांचा काळ कसा काढायचा, असा प्रश्न कलाकारांपुढे पडला आहे.
लॉकडाऊनमधील महिनाभराचे प्रयोग, एकूण नाटके आणि निर्मिती संस्था यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वास्तविक हा हंगाम नाटकांचा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर फारसे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे निर्मात्यांपुढेही आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. नाटक बसविण्यासाठी केलेला खर्च उत्सव, जत्रेच्यानिमित्ताने नाटकांचे प्रयोग ठिकठिकाणी अल्प मोबदल्यात सादर करून संस्था भागवित असतात. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व प्रयोग रद्द करण्यात आल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. सध्या काही संस्थांकडून ऑनलाईन कथा, कविता, नाट्यवाचन, एकपात्री स्पर्धा आयोजित केल्या जात असून त्यासाठी मात्र चांगला प्रतिसाद लाभत आहे.
.................................
व्यावसायिक नाटके पूर्णपणे बंद असल्याने पडद्यामागच्या कलाकारांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमार ओढवली आहे. गतवर्षीप्रमाणे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कलेवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्यांवर उपासमार ओढवली आहे. लॉकडाऊन संपले तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे नाट्यव्यवसाय सुरू होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व कलाकारांना शासनाकडून मदत करण्यात यावी.
- समीर इंदुलकर,
कार्याध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा.