आदर्श गाव घडविण्यात सर्वांचा समन्वय
By Admin | Updated: July 13, 2014 00:22 IST2014-07-13T00:18:55+5:302014-07-13T00:22:00+5:30
देवडेतील समन्वय : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

आदर्श गाव घडविण्यात सर्वांचा समन्वय
रत्नागिरी : देवडे गावाने शासनाच्या विविध योजनांमध्ये नोंदविलेला सहभाग कौतुकास्पद असून गावकरी आणि प्रशासन यांच्या समन्वयाने देवडे हे गाव इतरांना आदर्श ठरु शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथे समाधान योजनेंतर्गत आयोजित गावभेट कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे, तहसिलदार वैशाली माने, गटविकास अधिकारी कुलकर्णी, सरपंच हरिभाऊ घुमप आदि उपस्थित होते. शासनाच्या कल्याणकारी योजना थेट गावकऱ्यांच्या दारापर्यंत नेण्यासाठी समाधान योजना राबविण्यात येत आहे. यामुळे गावकरी व प्रशासन यांच्या थेट संवाद होऊन त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यास मदत होत आहे. शासनाच्या विविध विभागाबाबतच्या अडचणी सोडवून घेण्यास गावकऱ्यांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, शेती, आरोग्य या क्षेत्रातील योजनांची माहिती घेऊन गावकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शासन समाधान योजनांसारख्या उपक्रमातून लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे गावकऱ्यांचे वेळ व श्रम वाचून प्रशासनावरील ताण देखील कमी होत असल्याचे उकार्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध दाखले, आम आदमी विमा योजनेचे प्रमाणपत्र, संगणकीकृत ७/१२ उतारा, अंत्योदय योजनेंतर्गत धान्यांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.यावेळी महसूल, आरोग्य, कृषि, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अर्जांचे वितरण देखील करण्यात आले. (प्रतिनिधी)