खेर्डीत तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरूनच ‘तंटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:22+5:302021-09-26T04:34:22+5:30
चिपळूण : तालुक्यात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या ऑनलाइन ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीवरून काहीसा वाद झाला. शेवटी ग्रामसभेचे ...

खेर्डीत तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरूनच ‘तंटा’
चिपळूण : तालुक्यात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या ऑनलाइन ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीवरून काहीसा वाद झाला. शेवटी ग्रामसभेचे अध्यक्ष विजय शिर्के यांनी तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवृत्त तलाठी काशिनाथ दाते यांची निवड जाहीर केली. या निवडीवरून अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले शशांक भिंगारे यांनी आक्षेप घेतला. तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड बेकायदा असून ती रद्द करावी. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा शशांक भिंगारे यांनी ग्रामसभेचे अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेर्डी ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या ऑनलाइन सभेत १०० हून अधिक ग्रामस्थ व महिलांनी सहभाग घेतला होता. ग्रामसभेच्या अध्यक्षपदी विद्यमान उपसरपंच विजय शिर्के होते. विविध बाबींवर चर्चा झाल्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय ग्रामसभेसमोर ठेवण्यात आला. काही ग्रामस्थांनी अध्यक्षपदी निवृत्त तलाठी काशिनाथ दाते यांचे नाव सुचवले. गावात जागा जमिनीवरून विविध प्रकारचे वाद आहेत. दाते यांची निवड झाल्यास येथील वाद गावातच मिटण्यास मदत होईल. यामुळे दाते यांना संधी देण्याचे मागणी करण्यात आली.
यावेळी शशांक भिंगारे हेदेखील इच्छुक असल्याचे काही ग्रामस्थांनी सुचवले. भिंगारे हे युवा नेतृत्व आहे. विविध सामाजिक बाबींची त्यांना जाण आहे. त्यामुळे भिंगारे यांना अध्यक्ष करण्यात यावे, असे सुचवण्यात आले. त्यानंतर अनिल फाळके यांनीही आपण इच्छुक असल्याचे सांगितले. ग्रामस्थांमध्ये तिघांच्या नावावरून एकमत होत नव्हते. शेवटी तंटामुक्त अध्यक्षपदी काशिनाथ दाते यांची निवड करीत असल्याचे ग्रामसभेचे अध्यक्ष विजय शिर्के यांनी जाहीर केले. त्यानंतर शशांक भिंगारे यांनी ग्रामसभेचे अध्यक्ष व सचिवांच्या नावे निवेदन देत नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आक्षेप घेतला.
भिंगारे यांनी दिलेल्या निवेदनानुसार ऑनलाइन सभेत तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी ग्रामस्थांनी दिलेले मत ग्रामस्थ ग्रामसभा अध्यक्षांनी विचारात घेतलेले नाही, असे म्हटले आहे. ग्रामसभा अध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तंटामुक्ती अध्यक्ष निवड जाहीर केली. त्यांनी ग्रामसभेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे ही निवड रद्द करून यावी, अशी मागणी भिंगारे यांनी केली आहे. तर झालेली निवड ही ग्रामसभेचा कल आणि मत पाहूनच झाले असल्याचे अध्यक्ष विजय शिर्के यांनी सांगितले.