केवळ स्वार्थासाठीच जप्ती
By Admin | Updated: October 16, 2015 22:45 IST2015-10-16T21:05:44+5:302015-10-16T22:45:29+5:30
गुहागर तालुका : मयुरेश कचरेकर यांचा सरपंचांवर आरोप

केवळ स्वार्थासाठीच जप्ती
गुहागर : आरजीपीपीएलकडून करापोटी एक कोटी वीस लाख न आल्याने सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीवर जप्तीचा इशारा दिला होता. यामुळे कंपनीला टाळे लागून कामगारांवर उपासमारीची वेळ येणार हे माहीत असूनही केवळ स्वार्थासाठी ही जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप नगरसेवक मयुरेश कचरेकर यांनी केला आहे. आरजीपीपीएल हा गुहागर तालुक्यातील एकमेव मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील ८०० ते ९०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. या कंपनीचे बरेचसे क्षेत्र हे अंजनवेल ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात करापोटी एक कोटी वीस लाख रुपये ग्रामपंचायतीला देऊ न शकल्यामुळे त्याच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीवर जप्ती आणण्याचा इशारा दिला होता. कंपनीला टाळे लागले तर तालुक्यातील सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ येईल याचा साधा विचार न करता केवळ स्वत:च्या फायद्यासाठी कराच्या स्वरुपात मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांमधून आणखी लाखोंचा भ्रष्टाचार करायचा हाच त्यांचा निव्वळ उद्देश होता, असे ते म्हणाले.अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून होणारी वीज निर्मिती मागील दोन वर्षापासून पूर्णपणे बंद असल्याने प्रकल्प प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कंपनी कसे तरी रडत - खडत कामगारांचे पगार करत आहे. या कंपनीमुळेच तालुक्यातील शेकडो कामगारांच्या कुटुंबातील चुली पेटत आहेत. या आर्थिक संकटामुळे कंपनी अंजनवेल ग्रामपंचायतीचे कर देऊ शकली नाही. कंपनीची परिस्थिती माहिती असतानाही सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीला जप्तीचा इशारा दिला. या जप्तीने कंपनी बंद झाल्यास सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ येईल याचा विचार त्यांनी केलेला नाही, असे ते म्हणाले. कर वसूल नाही झाला तर गावातील विकासकामे करु शकणार नाही असे कारण त्यांनी पुढे केले आहे. वास्तविक आजपर्यंत ग्रामपंचायतीला कोट्यवधींचा कर मिळाला असून, अंजनवेल ग्रामपंचायत अतिशय भक्कम आर्थिक स्थितीत आहे. काही वर्षे कर नाही मिळाला तरीही ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्याप्रकारे चालू शकेल हे लेखा परीक्षणातील शिल्लक रकमेच्या आकडेवरुन दिसून येते, असे कचरेकर यांनी म्हटले आहे.परंतु, या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्यांतील सहभाग पाहता त्यांनी ९०० कुटुंबांच्या रोजीरोटीपेक्षा कंपनीकडून कराच्या रुपाने आलेले कोट्यवधी रुपये कोणत्याही परिस्थितीत वसूल करुन आर्थिक घोटाळे करायचे हे या ग्रामपंचायतीच्या एका मागोमाग एक बाहेर पडत असलेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांवरुन स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोपही कचरेकर यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)
आरोपाच्या फैरी : ना खायेंगे ना खाने देंगे
सरपंच यशवंत बाईत हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. याआधी गावठाण जमिनीच्या प्रशासकीय गैरप्रकरणात व आता ग्रामसचिवालयाच्या बांधकाम प्रकरणात आर्थिक भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे पुरावे समोर असताना त्यांच्यावर ‘ना खायेंगे ना खाने देंगे’ असे म्हणणारे पक्षाचे राज्य चिटणीस विनय नातू पक्षांतर्गत कारवाई करणार की, अजूनही दिशाभूल करणारी वक्तव्ये करुन भ्रष्टाचाऱ्यांना पाठबळ देणार? असा खडा सवाल त्यांनी केला आहे. कचरेकर यांच्या आरोपांमुळे गुहागर तालुका पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. यामुळे गुहागरातील राजकीय वातावरण तापले असून, या वादाची ठिणगी कोणता भडका उडवणार याकडेच गुहागरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
वस्तुस्थिती काय?
सरपंच यशवंत बाईत यांच्यावर झालेल्या आरोपानंतर गुहागरातील राजकीय वातावरणात गरमागरम चर्चा सुरू आहे. यामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याचा उलगडा यशवंत बाईत यांनी करावा, अशी मागणी होत आहे.