संगणक शिक्षण संकटात
By Admin | Updated: August 27, 2015 23:37 IST2015-08-27T23:37:57+5:302015-08-27T23:37:57+5:30
खेड तालुका : विजेचे बिलच भरले नसल्याने शाळा अंधारात

संगणक शिक्षण संकटात
श्रीकांत चाळके- खेड हायटेक शिक्षणाची कास धरून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. दोन वर्षांपूर्वी ही योजना अमलात आली आहे. प्राथमिक पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात तंत्रशिक्षणाची भर पडावी, हा यामागचा हेतू आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील १३३ प्राथमिक शाळांनी विजेची बिले न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, खेड तालुक्यातील तब्बल ६० शाळांना याचा फटका बसला आहे.खेड तालुक्यात ३७९ प्राथमिक शाळा आहेत़ त्यातील ६० प्राथमिक शाळांमधील विजेची जोडणी तोडण्यात आली आहेत़ शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम हाती घेतली होती. त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होऊ शकले. त्यापाठोपाठ आजच्या गतिमान शिक्षण प्रणालीच्या प्रवाहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ओढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार संगणक उपलब्ध करून दिले गेले. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा झाला़ त्यांना पायाभूत प्रशिक्षणही मिळू लागले. एकीकडे ही ज्ञानाची गंगा ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात असतानाच १३३ शाळांमध्ये वीजपुरवठा नसल्याने तेथील शेकडो विद्यार्थ्यांच्या हायटेक शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.वीजबिल भरले नसल्याने अशा शाळांचा महाविरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या शाळांमधील संगणकही पडून आहेत.
यापूर्वी शासनाकडून मिळणाऱ्या ४ टक्के सादील योजनेच्या निधीतून शाळांसाठी आवश्यक असलेली वीजबिले, खडू, पाणीबिल भागविले जाते. मात्र, दोन वर्षांपासून या योजनेअंतर्गत शिक्षण विभागाला निधीच मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीची विविध बिलेही थकली आहेत. ४ टक्के सादील योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून ही बिले यापूर्वी भरली जायची. परंतु हा निधीच न मिळत नसल्याने बिले भरलेली नाहीत तर वीजबिलांना वाणिज्य दर लावण्यात आल्याने ती भरणेही ग्रामस्थांना अशक्य झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे.
जिल्ह्यात २७४६ शाळा आहेत. गतवर्षी आॅक्टोबरअखेर यापैकी १३३ प्राथमिक शाळांमध्ये विजेचे जोडणी तोडण्यात आली होती, तर खेड तालुक्यातील ३७९ प्राथमिक शाळांमधील तब्बल ५० पेक्षा जास्त प्राथमिक शाळांमधील विजेची जोडणी तोडण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांबरोबरच संगणक संचही अंधारात पडून असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
खेड तालुक्यातील विजेची जोडणी तोडलेल्या प्राथमिक शाळांची संख्या लक्षणीय असून, तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. काही शाळांची बिले स्थानिक पातळीवर ग्रामस्थ किंवा पालकांनी तसेच लोकनिधी गोळा करून भरली आहेत. मात्र, अशा शाळांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढीच आहे. उर्वरित प्राथमिक शाळांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दोन वर्षे ही समस्या कायम असताना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
युती सरकार लक्ष पुरवेल ?
महावितरण कंपनीने प्राथमिक शाळांमधील विजेची बिले वाणिज्य दराने आकारल्याने बिले भरणे अशक्य झाले आहे़ ही बिले भरणे ग्रामस्थांनाही अशक्य आहे. प्राथमिक शाळांमध्ये ही बिले भरण्याबाबत कोणत्याही निधींची तरतूद करण्यात आली नाही. लोकसहभागातूनच ही बिले भागवली जातात. महावितरणने ही बिले घरगुती दराने आकारावीत, यासाठी विधिमंडळात महावितरणशी बोलणी सुरू असल्याची माहिती गतवर्षी शिक्षण विभागातर्फे देण्यात आली होती. मात्र, आघाडी सरकारच्या घुमजावामुळे याप्रकरणी दुर्लक्ष झाले. आता युती सरकारने याबाबत स्वत: लक्ष घालणे आवश्यक आहे़