बालगृहाच्या संस्कारातून सुरक्षेचे ‘अभय’ देणारा कमांडो
By Admin | Updated: August 22, 2015 00:24 IST2015-08-22T00:23:04+5:302015-08-22T00:24:06+5:30
ओणी येथील वात्सल्यमंदिर संस्था

बालगृहाच्या संस्कारातून सुरक्षेचे ‘अभय’ देणारा कमांडो
शोभना कांबळे, रत्नागिरी
अनाथ मुलांना मायेची पाखर मिळाली, त्यांना पुढे जाण्यासाठी समाजाने पाठिंबा दिला तर हीच मुले भविष्यात इतरही अशा अनाथांच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी सक्षम होतात. एवढेच नव्हे देशाच्या संरक्षणाची धुराही समर्थ पेलण्यास तयार होतात, हे सिद्ध केलयं ंओणीतील वात्सल्य मंदिरच्या अभय तेली या मुलाने. संस्थेने त्याच्यावर केलेल्या संस्कारामुळे अभय कमांडो म्हणून देशाचे संरक्षण करीत आहे.
ओणी (ता. राजापूर) येथील वात्सल्यमंदिर ही संस्था गेली १३ वर्षे कार्यरत आहेत. या संस्थेत आलेल्या अनेक निराधार मुलांना मायेचे छत्र देऊन त्यांना स्वबळावर उडण्यासाठी या संस्थेने त्यांच्या पंखात बळ निर्माण केले आहे. म्हणूनच आज अनेक मुले उच्च शिक्षण घेऊन वरिष्ठ पदापर्यंत पोहोचली आहेत. यातील एक नाव म्हणजे अभय अशोक तेली.
अभय मूळ पावशी (ता. कुडाळ) येथील. दुसरीला असतानाच त्याचे आई वडील एका अपघातात गेले. अभयच्या इतर भावंडांचे शिक्षण करण्यास नातेवाईक पुढे आले. मात्र, अभयला वात्सल्य मंदिरात दाखल करण्यात आले. मात्र, या संस्थेने त्याच्यावर आई वडिलांच्या प्रेमाची पाखर घालतानाच त्याचे भविष्य घडविले. दुसरी ते बारावीपर्यंत अभय वात्सल्य मंदिरात होता. डॉ. महेंद्र गुजर आणि त्यांचे एकंदरीत कुटुंब यांच्या प्रेमळ वातावरणामुळे त्याच्या अंगभूत कलागुणांना अधिकच वाव मिळाला. शालेय स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तो पहिला आला. बारावीनंतर संस्थेने त्याला पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. महाविद्यालयीन जीवनात तर अभयची अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रात वेगाने आगेकूच सुरू झाली. महाविद्यालयीन जीवनात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवितानाच त्याचा अभ्यासही तेवढ्याच वेगाने सुरू होता. म्हणूनच २०१० मध्ये तो समाजशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठात प्रथम आला. संस्थेने त्याच्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे त्याने सार्थक करून दाखविले. त्यानंतरही त्याने मानवी हक्क आयोगाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम विशेष श्रेणीत पूर्ण केला. समाजशास्त्र हा त्याचा मुख्य विषय असल्याने तो या क्षेत्रात आपोआपच कार्यरत झाला. त्याने स्त्रीभ्रुण हत्या, व्यसनमुक्ती या विषयांवर समाजात जनजागृती करण्यास सुरूवात केली. यावर त्याची अनेक ठिकाणी व्याख्यानेही झाली आहेत. गडहिंग्लज येथे झालेल्या २१ व्या राज्यस्तरीय समाजशास्त्र परिषदेत त्याने जैतापूर प्रकल्पावर व्याख्यान दिले.
आपल्याला देशासाठी काहीतरी करायचेय, ही ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच्या धडपडीला यश आले. विविध खेळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या स्कॉलर मुलाची २०११मध्ये रत्नागिरी पोलीस दलात नियुक्ती झाली आणि त्याच्या स्वप्नांना दिशा मिळाली. या कालावधीतही त्याची कामगिरी चमकदार होती.
त्याची दखल घेत २०१३मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या विशेष पथकात त्याची कमांडो म्हणून नियुक्ती झाली आहे. देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने अभय स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अभय याला वरिष्ठ पदावर जायचयं.
देशसेवा करतानाच अभयची धडपड आपल्यासारख्या अनेक अनाथ मुलांची आयुष्ये घडावीत, याकडे लागले आहे. गरीबी जवळून पाहिल्याने समाजातील अनाथ मुलांच्या पाठिशी उभे रहाण्याचा संकल्प त्याने केला आहे. समाजानेही अशा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून त्यांना प्रोत्साहन दिले तर हजारो मुले वरिष्ठ पदावर पोहोचतील, असे मत अभय व्यक्त करतो.