मुख्य वनसंरक्षकांकडून किनाऱ्याची पाहणी
By Admin | Updated: August 20, 2015 22:04 IST2015-08-20T22:04:08+5:302015-08-20T22:04:08+5:30
दिसतं तसं नसतं... : हाकेच्या अंतरावर वृक्षावर कुऱ्हाड

मुख्य वनसंरक्षकांकडून किनाऱ्याची पाहणी
शृृंगारतळी : दापोली व गुहागर तालुक्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या जंगलाची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एस. एच. पाटील (नागपूर) व विभागीय वन अधिकारी नियोजन एम. एस. भोसले (कोल्हापूर) यांनी नागपंचमीच्या दिवशी किनारी असणाऱ्या नाना-नानी पार्क, सुरूबन, नक्षत्रबनाची पाहणी केली व समाधन व्यक्त केले.नागपंचमीच्या दिवशी बुधवारी नागपूर व कोल्हापूर येथील वन विभागाचे अधिकारी व त्यांच्या सोबत असणाऱ्या वर्दीतील फौजफाट्याने दापोलीपासून गुहागर किनारपट्टीच्या कडेने असणाऱ्या वनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून गुहागरसह संबंध रत्नागिरी जिल्ह्यात ज्या प्रमाणात वृक्षतोडीचा वेग आहे, त्या प्रमाणात वृक्षलागवड होताना दिसत नाही. वृक्ष लागवडीचा सोपस्कार मात्र धुमधडाक्यात पार पाडला जातो. नागपंचमीच्या दिवशी आलेल्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समुद्राच्या कडेने नारळपाणी पित फिरण्यापेक्षा ज्या ठिकाणी जंगलतोड झाली आहे, त्याची पाहणी करण्याची गरज होती, असे म्हटले जात आहे.गुहागरच्या ग्रामीण भागासह आबलोली, भातगाव-रत्नागिरी रोड याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. मात्र, याकडे डोळेझाक केली जात आहे. घाटमाथ्यावर अनेक दिवसापासून पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे.़ दुष्काळसदृश भागातील अधिकाऱ्यांना रखरखते ऊन व ओसाड प्रदेश कायम नजरेसमोर पाहण्याची सवय असल्याने अचानक डोळ्यासमोर किनारपट्टीचे हिरवेगार सौंदर्य दिसल्याने समाधान व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांना वरिष्ठांना कुठे आणि कसे फिरवायचे, याची चांगली कला अवगत असल्याची कोपरखळी एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. (वार्ताहर)