चिरा उत्खनन; कारवाईवर सुनावणी पुढे ढकलली
By Admin | Updated: February 23, 2016 00:44 IST2016-02-23T00:44:47+5:302016-02-23T00:44:47+5:30
तहसीलदार : व्यावसायिकांची मागणी मान्य

चिरा उत्खनन; कारवाईवर सुनावणी पुढे ढकलली
राजापूर : उत्खनन प्रकरणी राजापूर तहसीलदारांनी लावलेली सुनावणी चिरेखाण व्यावसायिकांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्यात आली असून, आता ती २५ फेब्रुवारीला होणार आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी राजापुरातील चिरेखाणींवर अचानक धाड टाकून सुमारे पाच खाणी बंद करताना तेथे असलेल्या मशिन्सना सील लावले होते. त्यानंतर तालुका प्रशासनाकडून रितसर झालेल्या बेकायदेशीर उत्खननाची पाहणी करुन त्याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार सुमारे ३ हजार २५१ ब्रास चिऱ्यांचे बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या चिरेखाणवाल्यांनी परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केले आहे.
त्यामध्ये प्रमोद घाडी ३७१ ब्रास, अजित धुमाळे ९३० ब्रास, नारायण गार्डी १५८ ब्रास तर रस्त्यापासून अंतर सोडण्याच्या नियमाचा भंग केल्यामुळे अनिल पांगरे यांना ६२६ ब्रास, मनोज पवार २९६ ब्रास व कुमार इपलकर यांनी ८७० ब्रास बेकायदेशीर उत्खनन झाले आहे.
या सर्वांविरुध्द प्रती ब्रास २२०० प्रमाणे त्याच्या पाचपट व प्रती ब्रास १०० रुपयांप्रमाणे रॉयल्टी या स्वरुपात दंड ठोठावण्यात आलेला आहे. त्यानुसार ही दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी संबंधित खाणवाल्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी महसूल प्रशासनाने संधी देताना सोमवारी सुनावणी आयोजित केली होती. त्याची नोटीस संबंधितांना पाठविण्यात आली होती. मात्र, चिरेखाण चालकांकडील कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्यांनी पुढील तारीख म्हणणे मांडण्यासाठी दिली जावी, अशी मागणी तहसीलदार सचिन भालेराव यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून, पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
४जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून केले होते पाच ठिकाणी मशिन्सना सील.
४खाणवाल्यांना बाजू मांडण्यासाठी सुनावणी.