रत्नागिरीत गोळी झाडून फकिराचा खून
By Admin | Updated: June 30, 2016 00:06 IST2016-06-29T23:51:52+5:302016-06-30T00:06:36+5:30
हल्लेखोर बुरखाधारी : तरुणालाही धमकावले

रत्नागिरीत गोळी झाडून फकिराचा खून
रत्नागिरी : दोन्ही हातात कुबड्या घेऊन जेवणासाठी चालत जाणाऱ्या सैतुल्ला नामक फकिरावर अज्ञात बुरखाधारी हल्लेखोराने गावठी कट्ट्याने गोळी झाडली. पाठीवर वर्मी बसलेल्या या गोळीने फकीर जोरदार किंकाळी मारत रस्त्यावर कोसळला. दहा मिनिटे त्याची तडफड सुरू होती. त्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. शहरातील पऱ्याची आळी येथे भर रस्त्यावर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
गोळी झाडल्यानंतर पळून जाणाऱ्या हल्लेखोरास पकडण्यासाठी तेथीलच एक तरुण धावला. मात्र, त्याच्यावरही हल्लेखोराने गावठी कट्टा रोखला व तो काळोखात पसार झाला. गोळीबाराच्या आवाजाने गजबजलेल्या या भागातील निवासी इमारतींमधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर काही काळातच रत्नागिरी शहर पोलिस, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस व राखीव दलाचे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोराने गोळी झाडल्यानंतर प्रमोद महाजन संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने पलायन केले. त्याने वाहन दुसऱ्या ठिकाणी उभे करून ठेवलेले असावे व त्यावरून तो पसार झाला असावा, असाही अंदाज व्यक्त होत आहे. शहराच्या सर्व भागात हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू होते. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील, शहर पोलिस अधिकारी तसेच रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वैमनस्यातून कृत्य?
फकिराचा अज्ञाताने केलेला खून हा वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
गोळीबाराआधी संबंधित फकीर कुबड्या घेऊन जेवणासाठी निघाला होता, तर त्याच्यासोबत आणखी एक अपंग फकीरही जेवणासाठी निघाला होता.
त्यावेळी हा गोळीबार केवळ एकाच फकिरावर झाला. त्यामुळे हा खून नियोजनबद्ध असल्याचा संशय आहे. मृत फकिराजवळ नोटांचे बंडलही सापडल्याची चर्चा आहे.
खैरातीसाठी रत्नागिरीत...
रमजान महिना सुरू असल्याने राज्यातून तसेच राज्याबाहेरूनही खैरातीसाठी अनेक फकीर जिल्ह्याच्या विविध भागात दाखल झाले आहेत. ज्याच्यावर गोळीबार झाला तो सैतुल्लानामक फकीरही खेड, चिपळूण या भागातून गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरीतील पवित्र धर्मस्थळाच्या बाहेर खैरातीसाठी आला होता, असे त्याच्यासोबत घटनेवेळी उपस्थित असलेल्या कोलकाता येथील एका फकिराने सांगितले.