‘बायोगॅस’चे यंदा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

By Admin | Updated: May 1, 2016 00:14 IST2016-05-01T00:14:31+5:302016-05-01T00:14:31+5:30

पी. एन. देशमुख : जिल्ह््यात २७० प्रकल्पांची उभारणी

Biogas's goal is 100% complete this year | ‘बायोगॅस’चे यंदा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

‘बायोगॅस’चे यंदा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

रत्नागिरी : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत मागील आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बायोगॅसचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून, जिल्ह्यात २७० बायोगॅस उभारण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली.
चुलीला पर्याय म्हणून ग्रामीण भागात बायोगॅस उभारण्यात जिल्हा परिषद कृषी विभागाला काही प्रमाणात का होईना यश आले आहे. चुलींमुळे जंगलांचा ऱ्हास होतो. तसेच कंपन्यांकडून मिळणारा गॅस खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे बायोगॅस हा परवडणारा व प्रदूषणमुक्त असल्याने तो फायद्याचा ठरत आहे. त्यासाठी शासनाकडून बायोगॅस प्रकल्प उभारण्यास आर्थिक सहाय्यही करण्यात येते.
राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला बायोगॅस प्रकल्प देण्यात येतो़
बायोगॅसच्या एक घन फुटासाठी ५ हजार रुपये तर २ ते ५ घनफुटासाठी ९ हजार रुपये देण्यात येतात़ त्याला जर शौचालय जोडायचे असल्यास आणखी १२०० रुपये अधिक देण्यात येतात.
त्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे जनावर असणे आवश्यक आहे़ जिल्ह्यासाठी २७० बायोगॅस प्रकल्पांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी आत्तापर्यंत बायोगॅसच्या मागणीप्रमाणे कामे करण्यात आली असून, २७० बायोगॅस प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत.
शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली होती. मागेल त्याला बायोगॅस अशी योजना राबविण्यात आली होती. मात्र, या योजनेबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये उदासिनता दिसून येत होती.
अखेर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या प्रयत्नाला यश येऊन बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)
कृषी विभाग : दुरुस्तीसाठी मदत मिळत नसल्याची खंत
२०१४-१५ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्याला २५० बायोगॅस आणि २०१५-१६ मध्ये २७० बायोगॅस प्रकल्पांचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले होते. हे उद्दिष्ट दोन्ही वर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र, एखाद्या वेळी बायोगॅसच्या दुरुस्तीचे काम निघाल्यास त्यासाठी लागणारा खर्च लाभार्थ्यानेच करावयाचा असतो. दुरुस्तीसाठी शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे बायोगॅसबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. मात्र तरीही यंदा कृषी विभागाने आपले उद्दीष्ट पूर्ण केले आहे.
बायोगॅस वापर वाढला
चुलीला पर्याय म्हणून ग्रामीण भागात बायोगॅसचा प्रसार सुरु आहे. ग्रामीण भागात साऱ्यांनाच सिलिंडरचा पर्याय परवडत नाही. त्यांच्यासाठी बायोगॅस हा पर्याय आहे. त्यामुळे बायोगॅसचा वापर वाढू लागला आहे.

Web Title: Biogas's goal is 100% complete this year