सायकलची हवा काढली
By Admin | Updated: August 31, 2015 21:14 IST2015-08-31T21:14:35+5:302015-08-31T21:14:35+5:30
जिल्हाधिकारी : जिल्हा परिषदेची घनकचरा गोळा करण्याची योजना ‘कुंडी’त

सायकलची हवा काढली
रहिम दलाल --- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५६ ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा गोळा करण्यासाठी जिल्हा परिषदेने तीनचाकी सायकल खरेदीसाठी पाठवलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून नाकारण्यात आला.
जिल्ह्यातील एकाही नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात वा ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा प्रकल्प नसल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषद हद्दीमधील कचरा शहरातच टाकण्यात येतो. मात्र, त्याचे विघटन होत नसल्याने कचरा टाकण्यात येत असलेले परिसरातील रहिवासी प्रदूषणाने त्रस्त झाल्याचे चित्र सध्या सर्वच शहरांमध्ये दिसत आहे. जिल्ह्यात कितीही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असली तरी घनकचऱ्याचा प्रश्न जैसे थे आहे. शहरात कचराकुंड्यांमध्ये कचरा टाकण्यात येत असला तरी तो दररोज उचलणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने तो अस्ताव्यस्त पसरलेला असतो. तसेच रत्नागिरी शहरात घंटागाडीची सोय आहे. मात्र, सुटीच्या दिवशी कचरा विल्हेवाटीची सोय नसल्याने कचराकुंड्या भरलेल्या असतात.तसेच लोकसंख्या जास्त असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने बहुतांश वेळा कचराकुंड्यांमध्येच कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषदेकडून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात ४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा गोळा करण्यासाठी तीन चाकी सायकल ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. यामुळे मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य टिकून राहण्यास मदत होणार होती. म्हणून तीन चाकी सायकलसाठी प्रत्येकी २५ हजार ५०० रुपये खर्च करण्यात येणार होते. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ५६ ग्रामपंचायतींना अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी १४ लाख २८ हजार रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून हा प्रस्ताव नाकारण्यात आला. ग्रामपंचायतींना तीन चाकी सायकल देण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न केले होते. या ग्रामपंचायतींना आता अन्य कोणत्या योजनेतून तीन सायकल दिली जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)
रत्नागिरी शहरा लगतची शिरगांव ग्रामपंचायत जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी मानली जाते. या ग्रामपंचायतीने घरोघरी जाऊन कचरा संकलीत करण्यासाठी घंटागाडीची सोय केली आहे. ही घंटागाडी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक भागात जाऊन घनकचरा गोळा करते.
घंटागाडीची सोय
४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या-
तालुका ग्रामपंचायती
दापोली ६
खेड ३
चिपळूण ६
गुहागर ८
संगमेश्वर ५
रत्नागिरी१९
राजापूर ९
एकूण ५६