आदिवासींसाठी भूदान
By Admin | Updated: October 16, 2015 00:04 IST2015-10-15T21:19:28+5:302015-10-16T00:04:37+5:30
चिपळूण तालुका : शांताराम शिंदेंकडून १५ गुंठे जमीन दान

आदिवासींसाठी भूदान
चिपळूण : कादवड येथील ७ आदिवासी बांधवांना घरे मिळावीत, यासाठी शांताराम बाबाजी शिंदे यांनी आपली वडिलोपार्जित १५ गुंठे जमीन दान देऊन कातकरी बांधवांना आपला हक्क मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांना कायमचा निवारा मिळणार आहे.
आजकाल जमीन सोन्यापेक्षाही जास्त भावाने विकली जात आहे. जमिनीचा भाव गगनाला भिडला आहे, असे असताना कादवड येथील शिंदे यांनी आपली वडिलोपार्जित १५ गुंठे जमीन मधुकर जाधव, राम अंबाजी जाधव, सुरेश पवार, विश्वास जाधव, प्रकाश पवार, सुरेश निकम, सुप्रिया जाधव यांना बक्षीसपत्राने दान दिली. या आदिवासी बांधवांची कच्च्या स्वरुपाची घरे येथे आहेत. स्थलांतरित म्हणून ते येथे आले होते. घरे असली तरी मूळ जमीन त्यांच्या नावावर नव्हती. ती शिंदे यांच्या नावे होती. आदिवासी बांधवांना स्वत:ची जमीन असावी, यासाठी प्रयत्न सुरु होते. शिंदे यांनी आपली मुले व कुटुंबियांना विश्वासात घेऊन ही जमीन दान दिली. त्यामुळे आदिवासी बांधवांचा जमिनीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला. या जमिनीचे दानपत्र करताना उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, दुय्यम निबंधक जयवंती, तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी दिवाकर केळुसकर व तलाठी गणेश सुर्वे यांनी मोलाची कामगिरी बजावली. आदिवासी बांधवांना आवश्यक ते सर्व सहकार्य महसूलच्या अधिकाऱ्यांनी केल्याने हे दानपत्र यशस्वी झाले. आता लवकरच या सातही आदिवासी बांधवांना आपला हक्काचा सातबारा मिळणार आहे. वर्षानुवर्षे वास्तव्य करूनही आपल्या नावावर नसलेल्या जमिनीचे आपण मालक झालो असल्याचा आनंद आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. याबद्दल सर्व आदिवासी बांधवांनी शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत. शिंदे यांचा आदर्श समाजातील इतरांनी घेतला, तर आदिवासी बांधवांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असे सांगून तहसीलदार पाटील यांनी शिंदे यांना धन्यवाद दिले. (प्रतिनिधी)
हक्काचा सातबारा : आदिवासींची पक्के घरे---कादवड येथील आदिवासी बांधव ज्याठिकाणी राहात होते. ती जागा शांताराम शिंदे यांच्या मालकीची होती. आजच्या काळात जमिनीचे दर गगनाला भिडले असताना कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता शिंदे यांनी ही जमीन दान केली आहे. यामुळे आदिवासींना हक्काचा सातबारा मिळणार आहे.
कुटुंबियांची साथ
शिंदे यांनी दान केलेली जमीन ही वडिलोपार्जित आहे. त्यामुळे त्या जमिनीच्या सातबारावर अन्य सदस्यांचीदेखील नावे आहेत. त्यामुळे कुटुंबियांची साथ मिळणे महत्त्वाचे होते. कुटुंबियांनी त्यांना ही साथ दिल्याने भूदानाचे कार्य शिंदे करू शकले.