रत्नागिरी : तब्बल पाच वर्षे खडकात अडकून राहिलेल्या, अनेक तरुणांनी रील्स बनविल्यामुळे सर्वदूर प्रसिद्ध झालेल्या बसरा स्टार जहाजाचे सोमवार, २ जून रोजी दोन तुकडे झाले. सतत लाटांचा मारा बसल्याने हे जहाज भंगल्याचा अंदाज आहे.निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यामुळे हे जहाज भरकटले आणि ३ जून २०२० रोजी रत्नागिरीजवळच्या मिऱ्या किनाऱ्यावर दगडात अडकले. हे जहाज काढण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले सर्वच प्रयत्न तोकडे पडले. जवळपास ३५ कोटी रुपये इतकी त्याची किंमत होती.खाऱ्या पाण्याचा सततचा मारा आणि दुसरीकडे देखभाल-दुरुस्ती नाही. यामुळे हे जहाज सडल्याने आता ते अवघ्या दोन कोटी रुपयांमध्ये भंगारात काढले जाणार आहे.हे जहाज बाहेर काढण्यासाठी एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरीटाइम बोर्डाची कन्सल्टंट म्हणून काम करीत आहे. दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्यांनी ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Ratnagiri: बसरा स्टार जहाजाचे अखेर दोन तुकडे, चक्रीवादळात भरकटून तब्बल पाच वर्षे अडकले होते खडकात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:45 IST