कोकम योग्य दराच्या प्रतीक्षेत!

By Admin | Updated: June 27, 2016 00:40 IST2016-06-26T22:06:06+5:302016-06-27T00:40:14+5:30

व्यावसायिकांत नाराजी : कठोर परिश्रमानंतर आमसुलांना आजही बाजारपेठ नाही

Awesome awaiting tariff! | कोकम योग्य दराच्या प्रतीक्षेत!

कोकम योग्य दराच्या प्रतीक्षेत!

बाळकृष्ण सातार्डेकर -- रेडी परिसरात उन्हाळी हंगामाचा शेवट करणाऱ्या कोकम (रातांबा) पिकाला मोठ्या प्रमाणात बहर आला आहे. घरोघरी लोक कोकमापासून आमसुले (सोले) बनवतात. कठोर परिश्रम घेऊन तयार करण्यात आलेल्या या आमसुले पिकाला बाजारपेठ अथवा हवा तसा बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
रातांबा झाडावरून केवळ पडून फुकट जाऊ नये, म्हणून लोक हा व्यवसाय करीत आहेत. कोकणपट्टीतील आंबा व काजूप्रमाणे कोकमासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे, अन्यथा लोकांमध्ये असलेली अनास्था वाढत जाऊन काळानुरूप हा व्यवसाय बंद होऊ शकतो.
उन्हाळी हंगामात काजू, आंबा व कोकम ही तीन महत्त्वाची फळे कोकणातील, विशेषकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावातील घरात दिसतील. या दिवसात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आंबा, काजूगर किंवा कोकम सरबत देऊन केले जाते. पण आंबा, काजू या दोन फळांप्रमाणे कोकमासाठी म्हणाव्या तशा प्रमाणात बाजारपेठ अथवा प्रसिध्दी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या फळापासून तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठेत योग्य दर मिळत नाही, ही येथील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे.
आंबा, काजूनंतर कोकमचा हंगाम सुरू होतो. सध्या रेडी, शिरोडा, आरोंदा, आजगाव, तिरोडा, आरवली, टाक, आसोली, सोन्सुरे, धाकोरे, मळेवाड या गावांमध्ये या हंगामातील रातांबे गोळा करून त्यापासून विविध उत्पादने घेण्यासाठी शेतकरीवर्ग झटत असतो. रातांब्यापासून आमसुले (आगळी सोले), बियांपासून मुटला, कोकम सरबत, जेवणानंतर पचवण्यासाठी सोलकढी अशा प्रकारची घरगुती उत्पादने घेतली जातात. मात्र, इतर फळांच्या तुलनेत हे सर्व करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रंदिवस कष्ट करावे लागतात.
कोकम तयार करण्याची पध्दत
कोकम तयार करताना सर्वप्रथम झाडावर तयार झालेला रातांबा वर चढून काढावा लागतो. त्यानंतर गोळा करून तो घरी आणला जातो. घरातील माणसे किंवा मजूरवर्ग लावून त्या फळांचा रस, बिया व पाकळ्या वेगवेगळ्या केल्या जातात. आमसुले बनविताना तर अपार कष्ट करावे लागतात. कारण रातांब्याच्या पाकळ्या वेगळ्या केल्यानंतर त्या पाकळ्या चारवेळा आगळ या रसामध्ये भिजवून कडक उन्हात सुकवाव्या लागतात.
यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी जातो. प्रत्यक्षात आमसुले तयार करीत असताना नाकीनऊ येतात. मात्र, तयार झालेल्या आमसुलांना मिळणारा दर फार अल्प असतो. ही सर्व मेहनत ती तयार करण्यापेक्षा आमसुले बाजारात विकत घेणे परवडते. आमसुले तयार करताना त्यासाठीची मेहनत, मनुष्यबळ व होणारा खर्च पाहता मिळणारे उत्पन्न खूपच कमी असते. त्यामुळे कोकम तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
उत्पादने
आमसुले (आगळी सोला) - सर्वसामान्यघर ते पंचतारांकित हॉटेलमध्ये मच्छीकढी, आमटी, कालवण व सोलकढीला उत्कृष्ट चव येण्यासाठी कढी उकळताना प्रमाणानुसार आत आमसुले टाकली जातात. पित्त आले तर आमसुले पाण्यात भिजवून लावतात व कोकम रस पिण्यासाठी दिला जातो. कोकम रस उत्कृष्ट चवदार, थंड सरबत, ज्यूस, जेवल्यानंतर पचनासाठी उत्कृष्ट सोलकढीसाठीचा वापर केला जातो.
मुटले - कोकमाच्या बियांपासून उत्कृष्ट मुटले तयार केले जाते. त्याचा आहारात चपातीवर कडवून तेल म्हणून वापर केला जातो. थंडीच्या दिवसात माणसांच्या पायांना, ओठांना भेगा पडल्यास मुटले कडवून घासून लावले जाते. त्यामुळे भेगांमधील दाह शांत होऊन भेगा बऱ्या होतात.
अशाप्रकारे कोकणातील परंपरागत कोकम व्यवसाय करणारा शेतकरी थोड्याफार प्रमाणात का होईना, स्वत:चा उदरनिर्वाह करतात. सध्या बाजारपेठेत आमसुले १५० रूपये प्रतिकिलो दराने, कोकम मुटले २० रूपये प्रतिनग आणि सुकवलेल्या बिया (जुन्या) ५० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जातात.
शासनस्तरावर पडीक जमिनीत रातांबा लागवडीसाठी शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमांतून प्रोत्साहनपर भाषणे दिली जातात. विविध योजना राबवून लोकांना कोकम लागवडीसाठी प्रवृत्त केले जाते. प्रत्यक्षात मात्र जे लोक हा व्यवसाय परंपरागत करत आहेत, त्यांच्या मालाला उत्तम प्रकारची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. याबाबत शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत असून, चांगल्या दराची प्रतीक्षा आहे.


कोकमची प्रसिध्दी व्हावी, रातांब्यापासून विविध उत्पादने बनविण्याच्या कोकणातील या परंपरागत व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करून त्यासाठी शासनाने एक समिती बनविणे आवश्यक आहे. या समितीद्वारे उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यास प्रयत्न केले पाहिजेत. तरच हा व्यवसाय करणारा शेतकरी, बागायतदार व मजूरवर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल.
- अब्बास शेख,
बागायतदार, रेडी-म्हारतळेवाडी

आमसुले तयार करण्यापूर्वी रातांबा झाडावरून खाली काढण्यासाठी व रातांबा फोडण्यासाठी जास्त मोबदला देऊनही मजूरवर्ग वेळेत मिळत नाही. ही येथील शेतक री, बागायतदारांची मोठी समस्या आहे. त्यामुळे पाऊस पडल्यावर काढलेला रातांबा खराब होतो.

Web Title: Awesome awaiting tariff!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.