जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ६.१० मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:53+5:302021-04-24T04:31:53+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू असून, त्याचा परिणाम भूगर्भातील भूजल पातळीवर झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भूजल ...

जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ६.१० मीटर
रत्नागिरी : जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू असून, त्याचा परिणाम भूगर्भातील भूजल पातळीवर झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भूजल विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार पाण्याच्या पातळीत किरकोळ घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची भूजल सरासरी पातळी ०.१४ मीटर इतकी आहे.
यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे गतवर्षीपेक्षा पाणीटंचाईची तीव्रता कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात पाण्याचा टँकर उशिरा धावला. तसेच अजूनही पाणीटंचाईग्रस्तांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी आहे. भूजल पातळीसह मे महिन्यापर्यंत टंचाईची स्थिती काय राहील, याचा अंदाज घेण्यासाठी भूजल विभागाकडून २०२१ मार्चच्या अखेरीस सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
या अहवालानुसार मागील ५ वर्षातील सरासरी आकडेवारी ०.१४ मीटरने वाढली आहे. मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील सरासरी पातळी ६.१० मीटर आहे. भूजल पातळी व्यवस्थित असल्याने टंचाईची तीव्रता यंदा कमी राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार टँकरची गरज भासू शकते.
भूजल पातळीची स्थिती चांगली असल्याने यंदा जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात सध्या १२ गावांतील १४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. या टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षापेक्षा यंदाची पाणीटंचाई निम्मी आहे.