कलाक्षेत्राला सरकारी नोकऱ्यांनीच कलाकार पुरवले
By Admin | Updated: February 15, 2015 00:45 IST2015-02-15T00:45:34+5:302015-02-15T00:45:34+5:30
मकरंद अनासपुरे : जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी रमले स्नेहसंमेलनात

कलाक्षेत्राला सरकारी नोकऱ्यांनीच कलाकार पुरवले
रत्नागिरी : बहुतांश कलावंत हे सरकारी नोकरीमधून कलेच्या क्षेत्रात आले. ते फार मोठे झाले आहेत. प्रत्येक कलावंत हा स्नेहसंमेलनातून तयार होतो, असे मत आपले विचार मांडतांना मराठी चित्रपटातील अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यासपीठावरून कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे मनोरंजनही केले. जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, रत्नागिरीतर्फे आयोजित २०व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये ते बोलत होते.
यावेळी अनासपुरे यांचा सपत्नीक जिल्हा परिषदेच्यावतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अनासपुरे उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, आपला देश माणसांपेक्षा कागदांचाच जास्त आहे. कागदामध्ये सुजलाम्, सुफलाम् आहोत. आपण माणसांमध्ये सुजलाम्, सुफलाम् होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रत्येक कलावंत हा स्नेहसंमेलनातून तयार होतो. आपल्या स्नेहसंमेलनाला समय सुचकता दिली. संघर्षाच्या काळातील आठवणींना त्यांनी उजाला दिला.
मतभेद असावेत. मनभेद असू नयेत. त्यासाठी प्रत्येकांने प्रत्येकाला प्रेमाने जिंकावे. संस्कृती व परंपरा जपलीच पाहिजेत. मात्र, संस्कृतीचा बरमोडा होता कामा नये. ते जपणे अवश्यक आहे. दोन ज्ञानी एकत्र आले तर संवाद होतो. ज्ञानी व अडाणी एकत्र आले, तर विसंवाद होतो आणि दोन अडाणी एकत्र आले तर वादवादी होते, असे सांगतानाच लॉजिकल विचार कमी होत चालला आहे. मात्र, लॉजिकल विचार स्नेहसंमेलनातून होणे अवश्यक असल्याचे, त्यांनी
सांगितले.
यावेळी अनासपुरे यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या, उपविजेत्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा शिल्ड, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, उपाध्यक्ष सतीश शेवडे, बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण, सदस्य उदय बने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी शिक्षण व अर्थ सभापती ऐश्वर्या घोसाळकर, समाजकल्याण सभापती शीतल जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, कॅफो अविनाथ साळुंखे, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष वामन कदम व अन्य उपस्थित होते. (शहर वार्ताहर)