नाराज कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर येणार
By Admin | Updated: April 7, 2015 01:28 IST2015-04-06T22:59:50+5:302015-04-07T01:28:41+5:30
माधव गवळी : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट

नाराज कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर येणार
चिपळूण : तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दि. २२ रोजी होत असून, माधव गवळी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप स्वबळावर लढणार आहे. गवळी यांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु केली असून, चिपळूणमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमधील नाराज कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये यावे, त्यांचे भाजपामध्ये स्वागतच होणार आहे, असे मत माधव गवळी यांनी व्यक्त केले आहे.
गवळी या भाजपच्या युवा नेतृत्त्वाने चिपळूण - संगमेश्वर मतदार संघामध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावागावातील कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत आहेत. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती ठरविली जात आहे. आजपर्यंत तालुक्यात भाजपच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत नाही. मात्र, यावेळी काही ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकवणार, असा विश्वास गवळी यांनी व्यक्त केला आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने गावातील कार्यकर्ते गवळी यांच्याबरोबर गाठीभेटीचे आयोजन करीत आहेत, त्यांचे मार्गदर्शन घेत असून, गावाचा विकास झटपट होण्यासाठी भाजपलाच विजय करायला हवे, असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावपातळीवरील राजकारणाला महत्त्व प्राप्त झाले असून, विशिष्ठ परिस्थितीमुळे युतीतील दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने उभे राहणार आहेत. त्यामुळे नाराज उमेदवार भाजपाच्या वाटेवर आहेत.
आदर्श गाव या संकल्पनेसाठी वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमधील कार्यकर्ते आकर्षित होत आहेत. भाजपने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण विकासावर भर दिला आहे. प्रत्येक ग्रामपंचायत ब्रॉडबॅ्रडने जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमधील कारभार दिल्लीमध्ये दिसणार आहे. यापुढे ग्रामपंचायतीसाठी निधी परस्पर त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येक गावाचा विकास हाच ध्यास भाजपने घेतला आहे, याचा फायदा प्रत्येक ग्रामपंचायतीने घ्यायला हवा, असे गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
1चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप स्वबळावर रिंगणात उतरणार असल्याने या निवडणुकीत प्रथमच पक्षाचे अस्तित्व पणाला लागणार आहे.
2ग्रामपंचायत निवडणुकीत गावपातळीवरील राजकारणात पक्षाचा संबंध येत नसून, त्याबाबत यंदा उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजप वर्चस्व राखणार काय, याकडे लक्ष आहे.
चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाच्या घडामोडी.
गावातील विविध विकासकामांवर लक्ष देण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना.
विकासाचा ध्यास प्रत्येक ग्रामपंचायतीने घेणे गरजेचे, त्यासाठी प्रयत्न हवेत.
युतीचे उमेदवार येणार आमने- सामने असल्याने उत्सुकता.