धोकादायक शाळांची चुकीची यादी सादर केल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:31+5:302021-07-02T04:22:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक शाळा नादुरुस्त तसेच वादळाने जमीनदोस्त झाल्याची चुकीची यादी ...

Anger at submitting wrong list of dangerous schools | धोकादायक शाळांची चुकीची यादी सादर केल्याने संताप

धोकादायक शाळांची चुकीची यादी सादर केल्याने संताप

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक शाळा नादुरुस्त तसेच वादळाने जमीनदोस्त झाल्याची चुकीची यादी सादर केल्याचा आरोप करत सदस्यांनी संताप व्यक्त केला. या शाळांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिली. गुरुवारची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वेगवेगळ्या विषयांवरुन जोरदार गाजली.

ही सभा अध्यक्ष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत नादुरुस्त, धोकादायक तसेच वादळाने पडझड झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची यादी चुकीची असल्याचा जोरदार आरोप करत सदस्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी अध्यक्षांनी आपल्यासमोर या शाळांची यादी आलेली नसताना या सभेत कशी काय सादर करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच शाळा जमीनदोस्त तसेच निर्लेखनाची आवश्यकता असताना दुरुस्तीच्या मागणीचा अहवाल कसा सादर करण्यात आला, असा प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता यादी दिलेली असेल तर गटशिक्षणाधिकारी यांनीच निधी आणून शाळांची दुरुस्ती, बांधकाम करावे, अशा शब्दात सदस्यांनी सुनावले. चुकीच्या पध्दतीने यादी सादर करण्यात आली असून, पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी नादुरुस्त, पडझड झालेल्या शाळांचे पुन्हा सर्वेक्षण करुन यादी सादर करण्याच्या सूचना दिल्या.

नवोदय विद्यालयात इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मुद्दा माजी अध्यक्ष रोहन बने यांनी उपस्थित केला. जिल्हाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे समोर आले. त्यापैकी केवळ ३५ विद्यार्थी हजर असून, उर्वरित विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे समोर आले. अशाप्रकारे फसवणूक करुन प्रवेश घेतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यात २५१ केंद्र असून, या केंद्रातील किमान ५ मुलांना प्रवेशासाठी तयार करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना अध्यक्षांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिली. यावेळी अध्यक्षांनी १३ जुलै रोजी नवोदय विद्यालयाला भेट देणार असल्याचे सांगितले.

दापोली तालुक्यातील जालगाव नवानगर येथील रस्त्याचे प्रकरण न्यायालयात आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यानेच अतिक्रमण करुन रस्ता उखडल्याचे प्रकरण जोरदार गाजले. हा मुद्दा माजी सभापती चारुता कामतेकर यांनी उपस्थित करत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चुकीची माहिती सादर करत असून, त्या कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तसेच जिल्हा परिषदेचे वकील पॅनल करते काय, असाही प्रश्न कामतेकर यांनी उपस्थित केला. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, सर्व सभापती, सदस्य, खातेप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Anger at submitting wrong list of dangerous schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.