कृषी अधीक्षकांच्या निवृत्तिवेतनावर टाच

By Admin | Updated: August 22, 2015 00:24 IST2015-08-22T00:23:47+5:302015-08-22T00:24:14+5:30

पंपखरेदी प्रकरण भोवले : विभागीय चौकशी सुरू केल्याची जंगटे यांची माहिती

Anchorage on the retirement of Agriculture Superintendents | कृषी अधीक्षकांच्या निवृत्तिवेतनावर टाच

कृषी अधीक्षकांच्या निवृत्तिवेतनावर टाच

रत्नागिरी : आवश्यकता नसतानाही केलेली कृषी पंप खरेदी तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षकांना चांगलीच भोवली असून, त्यांचे निवृत्तिवेतन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची विभागीय चौकशीही सुरू असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक एम. के. जंगटे यांनी दिली.
रत्नागिरीत कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी सहसंचालक एम. के.जंगटे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता दोन ते तीन अश्वशक्तीचे कृषी पंप आवश्यक असताना पाच अश्वशक्तीच्या अकराशे पंपाची आॅर्डर एमईडीसी कंपनीला दिल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. अकराशे पंपासाठी अडीच कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला होता. शेतकऱ्यांची मागणी नसतानाही मागवलेले हे पंप जिल्हाभरातील तालुका कृषी कार्यालयांच्या गोडावूनमध्ये पडून आहेत. हे पंप स्वीकारण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. हे वृत्त सर्वांत प्रथम ‘लोकमत’नेच दिले.
पन्नास टक्के अनुदानावर वितरित केल्या जाणाऱ्या पंपाची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी नकार दर्शविल्यामुळे भरणे शक्य नसल्याचे सध्याचे प्रभारी कृषी अधीक्षक आरिफ शहा यांनी कळविले. तसेच आॅर्डरही रद्द केली. त्यामुळे तत्कालीन कृषी अधीक्षक सी. एस. गायकवाड यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पंप उतरवून घेण्यात आले आहेत, ते खराब झाले तर त्याची भरपाईची रक्कमही संबंधित अधिकाऱ्यांकडूनच वसूल केली जाईल, असेही जंगटे यांनी सांगितले.
यावेळी सहसंचालक जंगटे यांनी जिल्ह्याच्या पीक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा, जिल्हा परिषद कृषी अधिकारी पी. एन. देशमुख, आयडब्ल्यूएमपीचे प्रकल्प अधिकारी देसाई, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Anchorage on the retirement of Agriculture Superintendents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.