आबलोली गावात दारुबंदीसाठी सर्व महिला एकवटल्या
By Admin | Updated: January 30, 2015 23:15 IST2015-01-30T22:49:35+5:302015-01-30T23:15:40+5:30
ग्रामसभेतील निर्णय : केवळ ठराव नाही तर अंमलबजावणी

आबलोली गावात दारुबंदीसाठी सर्व महिला एकवटल्या
असगोली : आबलोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच प्रमोद गोणबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मराठी शाळा येथे उत्साहात झाली. यावेळी सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. त्यानंतर सविता विठ्ठल पागडे यांनी सर्वांचे लक्ष वेधत दारुबंदी झालीच पाहिजे, तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊन फॅशन म्हणून दारु पित आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. तरुणपिढी बरबाद होऊ नये, म्हणूनच आबलोली गावात दारुबंदी झालीच पाहिजे असा ठराव मांडताच सर्व महिला एकवटल्या व दारुबंदीचा ठराव संमत केला गेला. या ठरावाला मिनल कदम, सुप्रिया साळवी यांनी अनुमोदन दिले व सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
दारुबंदीसाठी आबलोली गावातर्फे महिलांची जाहीर सभा घेण्यात येणार असून पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्यासाठी पुढील रणनिती ठरवण्यात येणार आहे. यावेळी सरपंच प्रमोद गोणबरे, उपसरपंच प्रमेय आर्यमाने, सदस्य विजय वैद्य, नरेश निमूणकर, सदस्या मोहिनी पांचाळ, मानसी पागडे, अस्मिता रेपाळ, रसिका कदम, विनिता बाईत, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, ग्रामसेवक नाईक, पोलीसपाटील महेश भाटकर, उल्हास काळे, सुभाष काजरोळकर, महेंद्र कदम, सचिन बाईत, सचिव कारेकर यांच्यासह या ग्रामसभेला १२२ ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिला उपस्थित होत्या. या निर्णयामुळे तालुक्यातील अन्य गावातील महिलांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)