‘एपीएल’धारकांना धान्य सुरक्षाच नाही

By Admin | Updated: August 26, 2015 00:23 IST2015-08-26T00:23:44+5:302015-08-26T00:23:44+5:30

कोकण विभाग : शासनाचे १४ जिल्ह्यांना झुकते माप...

'Ahl' holders do not have food security | ‘एपीएल’धारकांना धान्य सुरक्षाच नाही

‘एपीएल’धारकांना धान्य सुरक्षाच नाही

रत्नागिरी : ‘एपीएल’ शिधापत्रिकाधारकांना गेल्या नोव्हेंबरपासून रेशनदुकानावरील धान्यपुरवठा बंद झाला आहे. कमी पाऊस पडलेल्या १४ जिल्ह्यात एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेप्रमाणे तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये आणि गहू प्रतिकिलो २ रुपये याप्रमाणे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. परंतु कोकणातील एपीएलधारकांची धान्य सुरक्षा शासनाने काढून घेतली आहे.केंद्र सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू झाली. या योजनेच्या प्राधान्य गट तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना धान्यपुरवठा नियमित सुरू आहे. मात्र, ‘एपीएल’धारकांना धान्य पुरवठा अनियमित केला गेला. नोव्हेंबर २०१४पासून तर धान्यपुरवठा पूर्णत: बंद करण्यात आला.
जिल्ह्यात ९८,१९३ एपीएल शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना प्रतिशिधापत्रिका धान्य देण्यात येते. जिल्ह्यासाठी एपीएलधारकांना ५६४ मेट्रिक टन गहू आणि ४६१ मेट्रिक टन तांदूळ इतके नियतन मंजूर आहे. १ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. ही योजना सुरू झाल्यानंतर एपीएलधारकांंच्या धान्य नियतनात अनियमितपणा आला.
नोव्हेंबरपासून या शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठाच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्डधारकांची आशा आता मावळलेलीच आहे. या कार्डधारकांना आता काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागते. त्यातच प्राधान्य गटासाठी उत्पन्नाच्या निकषावर यादी करताना अधिक उत्पन्न असलेल्यांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे.
त्यातच आता शासनाने सुरूवातीच्या काळात पाऊस न झाल्याने काही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे कारण सांगत यापैकी १४ जिल्ह्यातील ‘एपीएल’ शिधापत्रिकाधारकांनाही तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये आणि गहू प्रतिकिलो २ रुपयाने देण्यास सुरूवात केली आहे. यात औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र, उर्वरित जिल्ह्यात एपीएलधारकांना ९ रुपये दराने तांदूळ आणि ८ रुपये दराने गहू मिळणेही दुरापास्त झाले आहे.
कोकणातही गतवर्षीपासून पावसाच्या अनियमितपणामुळे शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागले आहे. शासनाने अन्न सुरक्षा योजनेमुळे नको, पण निदान नेहमीच्या दराने तरी आम्हाला धान्य द्यावे, अशी आर्त विनवणी एपीएलधारकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)

अन्नसुरक्षेचा तरी लाभ द्या...
कोकणात पावसाचा अनियमितपणा सुरुच आहे. त्यामुळे यंदाही शेती धोक्यात आली आहे. मात्र, कोकणातील एपीएलधारकांसाठी रेशनवर धान्यच बंद झाल्याने सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं ? असा सवाल आता जिल्ह्यातून विचारला जात आहे.

Web Title: 'Ahl' holders do not have food security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.