क्रीडा क्षेत्रात आरतीची राष्ट्रीय स्तरावर मजल--यश रत्नकन्यांचे
By Admin | Updated: January 15, 2016 00:23 IST2016-01-14T21:18:38+5:302016-01-15T00:23:53+5:30
जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका

क्रीडा क्षेत्रात आरतीची राष्ट्रीय स्तरावर मजल--यश रत्नकन्यांचे
मेहरून नाकाडे -- रत्नागिरी -अॅथलेटिक्स स्पर्धेबरोबर खो - खो स्पर्धेत आरती अशोक कांबळे हिने भरारी घेतली आहे. पाच राष्ट्रीय खा-ेखो स्पर्धांबरोबरच पाच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तिने यश संपादन केले आहे. आजपर्यंत तिने चार सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदके मिळवली आहेत.
आरती कांबळे सध्या एस. वाय. कला शाखेत शिकत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळ पुढे सुरू ठेवणार असल्याचे आरती हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरतीची आई गृहिणी असून, बाबा खासगी नोकरी करतात. मोठी बहीणही नोकरी करते. आरतीला लहान भाऊ असून, दहावीत शिकत आहे. आरतीच्या घरात कोणीही खेळाडू नाही. मात्र, रा. भा. शिर्के प्रशालेत शिकत असताना इयत्ता आठवीपासून शालेय संघातून खेळण्यास प्रारंभ केला. खो-खोबरोबरच अॅथलेटिक्समध्ये तिने यश मिळविले आहे. पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपद मिळाले. शिवाय अन्य राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांतही बक्षिसे मिळविली आहेत.
खो-खोच्या शालेय संघातून खेळता खेळता जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, अश्वमेध, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली. मुंबई, राजस्थान, नांदेड, फलटण, पुणे, जळगाव येथे झालेल्या स्पर्धांमध्ये घरच्या मंडळींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आरती सहभागी होऊ शकली. घरातून भक्कम पाठिंबा मिळत असल्यामुळेच आपण यश संपादन केले असल्याचे आरती हिने सांगितले.
शिर्के प्रशालेत असताना क्रीडा प्रशिक्षक विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज चवंडे दररोज आरती व तिच्या संघाचा सराव घेत आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धेत खेळत असताना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना, टीप्स देण्यात येतात.
शिवाय विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचेही विद्यापीठस्तराबरोबर राज्य, राष्ट्रीय स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभत आहे. सकाळी दोन तास व सायंकाळी तीन तास न चुकता आरती सरावासाठी छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर उपस्थित असते. स्पर्धा कोणतीही असो जिद्दीने स्पर्धेत उतरण्याबरोबर यश मिळविण्याचे तिचे ध्येय आहे.
भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून शासकीय वर्ग - १चा अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे, ते आपण पूर्ण करणारच, असा निर्धार केला आहे. माझ्यासाठी माझे कुटुंबिय घेत असलेल्या कष्टाचे आपण सार्थक करणार आहोत, असेही आरती हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.