६० सुरक्षारक्षक अखेर पुन्हा सेवेत
By Admin | Updated: February 23, 2016 00:33 IST2016-02-23T00:33:11+5:302016-02-23T00:33:11+5:30
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा : राजन साळवींच्या शिष्टाईला यश

६० सुरक्षारक्षक अखेर पुन्हा सेवेत
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंंधुदुर्गमध्ये कोकण सुरक्षा मंडळांतर्गत महापारेषण खात्यात सेवा देणाऱ्या ६० सुरक्षा रक्षकांना शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे सेवेतून कमी करण्यात आल्यानंतर आमदार राजन साळवी यांना कामगार मंत्री प्रकाश मेहता व सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांचेकडे कामगारांची सातत्यपूर्ण बाजू मांडल्यानंतर या सर्व ६० सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.
१५ ते २० वर्षांपासून सेवा देणाऱ्या या सुरक्षारक्षकांना शैक्षणिक वा शारीरिक स्वरुपाची अट लागू पडत नव्हती. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार या सुरक्षा रक्षकांना शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होताना किमान ८वी परीक्षा उत्तीर्णची अनाकलनीय अट घालणेत आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत असणारे सुरक्षारक्षक हे बहुतांशी स्थानिक, ग्रामीण भागातील व कमी शिक्षण झालेले असून, त्यांचे संपूर्ण कुटूंब या सेवेतून मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून आहे. अशा रत्नागिरी-सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील ६० सुरक्षारक्षकांना या शासन निर्णयाचा फटका बसल्याने त्यांना दि. २५ नोव्हेंबर २०१५ रोजी या सुरक्षारक्षकांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. शासन निर्णयामुळे प्रभावित झालेल्या रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील या सुरक्षारक्षकांनी आपली ही समस्या साळवी यांच्या दफ्तरी मांडली होती.
या पार्श्वभूमीवर आमदार साळवींनी नागपूर येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनावेळी राज्याचे कामगार, गृहनिर्माण व खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले होते व शासन निर्णयामुळे कोकणासहित राज्यातील अनेक सुरक्षारक्षक देशोधडीला लागणार असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर मेहता यांनी तातडीने स्वीय सचिव अनिल लाकसवार यांच्या माध्यमातून रत्नागिरीचे सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याशी संपर्क साधला व आपण अनेक वर्षे सेवा बजावित असलेल्या सुरक्षारक्षकांबाबत लवकरच सुधारीत आदेश पारीत करणार असल्याचे स्पष्ट केले. सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या माध्यमातून सेवेतून मुक्त केलेल्या ६० सुरक्षारक्षकांना आता कोकण सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून वाढीव मुदत देऊन सेवेत पुन्हा रुजू करुन घेण्यात आले आहे. या सुरक्षारक्षकांना कोकण सुरक्षा मंडळाच्या मार्फत कायमची सेवा देणेच्या अनुषंगाने शासनस्तरावर प्रक्रिया चालू असून, नजीकच्या काळात या सर्व रक्षकांना सेवेत कायम ठेवले जाईल. (प्रतिनिधी)
प्रश्न मार्गी : कर्मचाऱ्यांचा नि:श्वास
रत्नागिरी जिल्ह््यातील खेड -लोटे, संगमेश्वर - आरवली, चिपळूण -दस्तुरी, रत्नागिरी - पावस, निवळी, कुवारबांव, राजापूर - ओणी तसेच सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली, कणकवली, कुडाळ, तळेबाजार व खारेपाटण येथील कार्यालयांमध्ये सुरक्षारक्षक कार्यरत होते.