कशेडी ते धामणदिवी दरम्यान २५ हजार वृक्षांची होणार कत्तल
By Admin | Updated: February 11, 2016 23:51 IST2016-02-11T22:24:05+5:302016-02-11T23:51:24+5:30
खेड तालुका : पालकमंत्र्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी

कशेडी ते धामणदिवी दरम्यान २५ हजार वृक्षांची होणार कत्तल
श्रीकांत चाळके -- खेड --मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेग घेत आहे. चौपदरीकरणासाठी जमीन संपादन करणे आणि किंमत ठरविणे आदी महत्त्वाच्या कामांना कमालीचा वेग आला आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. खेड तालुक्यातील महामार्गालगतच्या कशेडी ते धामणदिवी दरम्यान सुमारे २५ हजार वृक्षांची कत्तल करण्याचे आदेश येथील वन विभागाला देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे. त्यामुळे चौपदरीकरण कामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला असेच म्हणावे लागेल.इंदापूर ते झाराप दरम्यान ३६६ किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरण कामाचा नारळ फुटल्यानंतर या कामाचा वेग काहीसा कमी झाला होता. मात्र, केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांचा रत्नागिरी दौरा आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सातत्याने होत असलेल्या चौपदरीकरण कामासाठीच्या महत्वपूर्ण बैठका यामुळे कामाला वेग आल्याचे दिसत आहे. मुंबई येथे मंत्रालयात झालेली चौपदरीकरणासंबंधातील बैठक आणि त्यानंतर तातडीने रत्नागिरी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत झालेली बैठक यांमधील तातडीच्या उपाययोजनांच्या आधारे चौपदरीकरण कामातील अडथळा दूर होण्यास मदत झाली आहे.
जमिनीचे मूल्यांकन करणे आणि मार्गातील अडथळे दूर करण्यासंबंधीत या बैठकीत चर्चा झाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेले महाकाय वृक्ष तातडीने तोडण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. खेड तालुक्याच्या हद्दीतील कशेडी ते धामणदिवी या भागात विविध प्रकारची सुमारे २५ हजार जुनाट झाडे आहेत. त्यातील काही कोसळण्याच्या स्थितीत आहेत, तर काही झाडे प्रवाशांना सावली देणारी आहेत. वन विभागाने या झाडांची गणना पूर्ण केली आहे. नुकतीच या झाडांची मोजणी झाली असून, ती तोडण्यासाठी वन विभागाने जोरदार हालचाल केली आहे.
याकरिता वनविभाग आता मजुरांच्या प्रतीक्षेत आहे. विविध प्रकराची झाडे आणि फळांची झाडेही यामध्ये आहेत. या झाडांचे मूल्यांकन करून होणारी किंमत संबंधित शेतकरी अथवा मालकांनाच मिळणार आहे. त्यामुळे वन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आता याच कामामध्ये गुंतून राहणार आहेत.