महिन्यात २१८५ शिक्षकांची बदली

By Admin | Updated: September 15, 2014 23:13 IST2014-09-15T22:37:54+5:302014-09-15T23:13:47+5:30

खोतगिरीला चपराक : जिल्हा परिषदेत प्रथमच विक्रमी बदल्या

2185 teachers change in the month | महिन्यात २१८५ शिक्षकांची बदली

महिन्यात २१८५ शिक्षकांची बदली

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून महिनाभराच्या कालावधीत २१८५ शिक्षकांची बदली करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच विभागात बदल्या करण्यात आल्या. गतवर्षीपासून शासनाने बदल्यांचे नियम बदलल्याने अनेक कर्मचारी, शिक्षकांची कायमच्या खोतगिरीला आळा बसला. काही शिक्षक, कर्मचारी राजकीय पुढारी, अधिकाऱ्यांना हाताशी एकाच तालुक्यामध्ये एकाच शाळेत, कार्यालयामध्ये अनेक वर्षे खोतकी करीत होते. त्याचा परिणाम शैक्षणिक दर्जावर झाला होता. त्याचबरोबर दुर्गम ग्रामीण भागामध्ये असलेल्या काही शिक्षकांना तेथेच खितपत पडावे लागले होते. मात्र, समुदेशनामुळे खोतगिरी मिरवणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
शिक्षण विभागाला ग्रामविकासमंत्र्यांकडून बदलीच्या आदेश अचानक येऊन धडकले होते. त्यामुळे शिक्षण विभागाला धावपळ करीत समुदेशन घ्यावे लागले होते. त्यासाठी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर शिक्षकांचे समुपदेशन घेताना रात्री उशिरा मोबाईलवरुन आदेश देण्यात आले होते. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील सभापती, उपसभापती यांनी बदल्यांच्या अचानक देण्यात आलेल्या आदेशामुळे त्या पुढे घेण्यात याव्यात, अशी सूचना केली होती. संगमेश्वर तालुक्यात समुदेपदशन न करता शिक्षक निघून गेले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने प्रशासकीय मेमो तयार करुन या बदल्यांचे आदेश दिले होते. शिक्षण विभागाने अशा गोंधळामध्येही व्यवस्थितपणे बदल्या पार पाडल्या.
शिक्षकांच्या बदल्या २७ जुलै ते २७ आॅगस्ट अशा महिनाभराच्या कालावधीत केल्या. या कालावधीत जिल्ह्यात २१८५ बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये जिल्हास्तरावर मराठी माध्यम मुख्याध्यापकांच्या - २०० बदल्या, उर्दू माध्यम - मुख्याध्यापकांच्या ६०, पदवीधरांच्या पहिल्या टप्प्यात मराठी माध्यम- ६६६, दुसऱ्या टप्प्यात - ७२५ आणि उर्दू माध्यमाच्या ३४ मुख्याध्यापकांच्या बदल्यांचा समावेश आहे. तालुकास्तरावरही ७०० उपशिक्षकांच्या समुपदेशनाच्या माध्यमातून बदल्या करण्यात आल्या.
समुपदेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बदल्यांच्या वेळी काही किरकोळ प्रमाणात शिक्षकांच्या तक्रारी होत्या. मात्र, त्याही सामोपचाराने सोडविण्यात शिक्षण विभागाला यश आले. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यात सुमारे ९००० शिक्षक आहेत. यापैकी २१८५ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. म्हणजेच ३० टक्के शिक्षकांच्या बदल्या केवळ एका महिन्यात करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्याच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत.

ऐतिहासिक कामगिरी
शिक्षण विभागाची ऐतिहासिक कामगिरी.
ग्रामविकासमंत्र्यांच्या अचानक आलेल्या आदेशामुळे समुपदेशन घेताना धावपळ.
संगमेश्वर तालुक्यातील समुपदेशन न करताना घेतला काढता पाय.
गोंधळी वातावरणानंतरही झाल्या बदल्या.

Web Title: 2185 teachers change in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.