गुहागर : कासव संवर्धनासाठी वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून, गुहागर समुद्रकिनाऱ्यावर १०० घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. या संरक्षित घरट्यांमधून गेल्या तीन दिवसात कासवांच्या १०८ पिल्लांना वन विभागामार्फत समुद्रात साेडण्यात आले.याबाबत वनपाल संतोष परशेटे यांनी सांगितले की, गुहागर बाग व गुहागर वरचापाट येथे समुद्रकिनारी सापडलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या १०० घरट्यांमधून १०,५३८ अंडी येथील कासव अंडी संरक्षण केंद्रामध्ये संरक्षित करण्यात आली आहेत. समुद्रकिनारी १६ डिसेंबर २०२३ रोजी सापडलेल्या पहिल्या घरट्यातून ४ फेब्रुवारीला १, ५ फेब्रुवारीला ४ व ६ फेब्रुवारी १०३ अशी एकूण १०८ पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आली. मे महिन्यापर्यंत या घरट्यातून कासवांची अनेक पिल्ले टप्प्याटप्प्याने बाहेर पडत राहतील, असे वनपाल परशेट्ये यांनी सांगितले.गुहागर समुद्रकिनारी कासवाची पिल्ले समुद्रात साेडताना गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, रानवीचे वनरक्षक अरविंद मांडवकर, अडूरचे वनरक्षक संजय दुंडगे, कासव मित्र देवेश परशेट्ये, सत्यवान घाडे उपस्थित होते.
Ratnagiri: गुहागरात कासवाची १०८ पिल्ले समुद्राकडे झेपावली, १०० घरट्यांमध्ये १० हजारांहून अधिक अंड्यांचे संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:55 IST