आम्ही रात्रीच्या वेळी आरोग्य सेवा देऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:32 IST2019-02-27T23:32:03+5:302019-02-27T23:32:07+5:30

जनसंवाद बैठकीत अधिकाऱ्यांची जाहीर कबुली : सरकारी आरोग्य संस्थेत एकही बालरोग तज्ज्ञ नाही

We can not provide health services at night | आम्ही रात्रीच्या वेळी आरोग्य सेवा देऊ शकत नाही

आम्ही रात्रीच्या वेळी आरोग्य सेवा देऊ शकत नाही

कर्जत : सायंकाळी ४ वाजल्यानंतर कर्जतच्या सरकारी आरोग्य संस्थामध्ये आरोग्य सेवा देऊ शकत नाही याची जाहीर कबुलीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्जतमध्ये दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत, आरोग्य सेवांवर देखरेख प्रकल्पामार्फत कर्जत तालुक्यातील आरोग्य समस्यांची मांडणी करण्यासाठी या प्रकल्पाची तालुका समन्वयक संस्था दिशा केंद्राने मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय जनसंवादाचे आयोजन केले होते. या जनसंवादामध्ये तालुक्यातील आदिवासी वाडीतील नागरिकांनी आपल्या आरोग्य समस्यांची मांडणी केली. त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.
गरोदर महिलांना संदर्भ सेवा न मिळणे, नवजात बालकांना आरोग्य सेवा न मिळणे, इंजेक्शन, सलाईन लावण्यासाठी पैसे घेणे यासारख्या गंभीर प्रश्नाची आदिवासी महिलांनी मांडणी केली. या सर्व प्रश्नांना जबाबदार असणारे आरोग्य अधिकारी मात्र समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. परिणामी आरोग्य प्रश्नावर प्रशासन व शासन गंभीर नाहीत ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.


कर्जत तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी कळंब वगळता कुठे रात्रीची आरोग्य सेवा मिळत नाही, तालुक्यातील सर्वात टोकाला असलेल्या व आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबिवली येथे सायंकाळी ४ वाजेनंतर कोणीच अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतात अशी मांडणी लोकांनी केल्यानंतर उपस्थित आरोग्य अधिकाºयांनी या आरोग्य केंद्रात राहायची व्यवस्था नाही म्हणून आम्ही दवाखाना बंद ठेवतो. ३५ किमी अंतरावर असलेल्या या प्राथमिक आरोग्य कें द्रातील नागरिकांना रात्रीच्या वेळी कर्जत किंवा कशेळे येथे यावे लागते, शहरापासून जवळच असलेल्या मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा ५ वाजल्यानंतर कोणीच अधिकारी उपस्थित राहत नाहीत.

कडाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्वात जास्त ओपीडी असणाºया प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने निवासस्थान बांधून तयार आहे तरी सुद्धा येथे डॉक्टर निवासी राहत नाहीत. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा निवासी व्यवस्था असून देखील निवासी राहत नाहीत या प्रश्नाच्या भडिमाराने उपस्थित अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाली. या जनसंवाद बैठकीस कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, पंचायत समिती उपसभापती काशिनाथ मिरकुटे, पंचायत समिती सदस्या सुरेखा हरपुडे, कविता ऐनकर आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका उपस्थित होते.

महत्त्वाचे मुद्दे
तालुक्यात एकही बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नाहीत.
स्त्री तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी माता मृत्यूच्या अनेक घटना घडल्या.
आलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचार न करता उल्हासनगर, पनवेल, कामोठे येथे जाण्याचा सल्ला दिला जातो.
आरोग्यासोबतच आदिवासी वाडीतील पाणीटंचाईचे प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात मांडले.

Web Title: We can not provide health services at night