महाडमधील १० गावांचा पाणीपुरवठा सुरळीत
By Admin | Updated: November 20, 2015 02:10 IST2015-11-20T02:10:02+5:302015-11-20T02:10:02+5:30
महाड तालुक्यातील काळ नदी पात्रावरील जॅकवेलमधून १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी १३ नोव्हेंबरला चोरून नेल्याची घटना घडली होती.

महाडमधील १० गावांचा पाणीपुरवठा सुरळीत
बिरवाडी : महाड तालुक्यातील काळ नदी पात्रावरील जॅकवेलमधून १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी १३ नोव्हेंबरला चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर महावितरणने सुमारे दोन लाख रु पये किमतीचा नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर जोडून या ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत केल्याने १० गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
बिरवाडी काळ नदी जॅकवेलमधून ढलकाठी, कातिवडे, भिवघर, वडघर, मोहोत, कोंड, निगडे या गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र चोरट्यांनी विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल चोरून नेऊन ट्रान्सफॉर्मरची मोडतोड केल्याने ऐन दिवाळीच्या सणात नागरिकांच्या घशाला कोरड पडली होती.या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मरची जोडणी पूर्ण झाल्याने या १० गावांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला असल्याची माहिती महावितरणचे कनिष्ठ अभियंता गवारी यांनी दिली आहे. (वार्ताहर)