पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई ?
By Admin | Updated: February 24, 2016 03:03 IST2016-02-24T03:03:18+5:302016-02-24T03:03:18+5:30
हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एकूण ८७ गावे व २१२ वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवणी आदी नद्या वाहतात.

पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई ?
पोलादपूर : हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एकूण ८७ गावे व २१२ वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवणी आदी नद्या वाहतात. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात. मात्र यंदा काही गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
पोलादपूर तालुक्यात एकूण नऊ धरणे प्रस्तावित आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे सुरूच झाली नाहीत. या वर्षी कोकणात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने डिसेंबरपासूनच पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात होता, मात्र यावर्षी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन शासनामार्फत केले आहे, यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये सहभागाबद्दल निरुत्साह दिसून येत आहे. या वर्षी भीषण पाणीटंचाई भासणार असून पोलादपूर पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठविलेल्या टंचाई आराखड्यात एकूण १३९ विंधन विहीर, ३२ गावे, ११८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
तालुक्यातील चिरेखिंड, वाकण मुरावाडी, कोसमवाडी, आंबेमाची, केवनाळे, कातली बंगला, कालवली भोसले वाडी, विठ्ठलवाडी आदी गावांचा सामवेश आहे. साधारणत: मार्च अखेरपर्यंत या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल असा ग्रामस्थांनी अंदाज वर्तविला आहे. तर पंचायत समितीने पाठविलेल्या आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजित २१.७४ लाखांची तरतूद केली आहे. विंधन विहिरीसाठी ५५.६० लाखांची तरतूद आहे. कोतवाल, कामथे, किनेश्वर गोळेगणी, सवाद आदी ठिकाणी धरणे प्रस्तावित असून एकाही धरणाचे काम झाले नाही. एकमेव देवळे धरण पूर्ण झाले असले तरी त्या धरणाची पाणीगळती काढण्यात लघुपाटबंधारे विभागाला अपयश आले आहे.
बंधाऱ्यांची गरज
चिरेखिंड येथील ईश्वर ढेबे यांनी टंचाईबाबत प्रतिक्रि या देताना सांगितले की, दरवर्षी शिमग्यानंतर आम्हाला जीवन नकोसे होते. हंडाभर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. तर रोजगार सोडून दिवसभर बायकापोरं पाण्यासाठी वणवण भटकत राहतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ओढ्यानाल्यावर व नदीवर छोटे छोटे बंधारे होणे गरजेचे असून शिवकालीन पाणी योजना पुनर्जीवित कराव्या लागतील, तरच पोलादपूरचा पाणीटंचाई प्रश्न काही प्रमाणात सोडवता येईल.