अक्षयतृतीयेला जिते गावात यात्रा
By Admin | Updated: May 9, 2016 02:26 IST2016-05-09T02:26:57+5:302016-05-09T02:26:57+5:30
जिते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गाव, समुद्रात मासेमारी करण्यासाठी यांत्रिकी ट्रॉलरवर खलाशी म्हणून या गावातील अनेक जण काम करतात.

अक्षयतृतीयेला जिते गावात यात्रा
पेण : जिते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गाव, समुद्रात मासेमारी करण्यासाठी यांत्रिकी ट्रॉलरवर खलाशी म्हणून या गावातील अनेक जण काम करतात. हा धाडसी व्यवसाय करतानाच श्री देव लक्ष्मीनारायणावर अखंड गावाची असीम श्रद्धा आहे. यामुळे एरव्ही मांसाहार करणारे गावकरी उत्सव कालखंडात १५ दिवस नेमाने शाकाहार करतात. ही उत्सवाची परंपरा ५३ वर्षे सुरू आहे. मंगळवारी अक्षयतृतीयेला जिते गावात यात्रा ही आनंदाची पर्वणी भक्तगण व शेतकरी बांधवांसाठी शुभमुहूर्ताचा उत्साही क्षण असतो.
गुरुवारी ५ मे ते ११ मे २०१६ पर्यंत आठवडाभर लक्ष्मीनारायण महोत्सव गावात भक्तिभावाने साजरा होतो. यंदा ५३ वे वर्ष असून, नारायण हरी, नारायण हरी, भक्ती मुक्ती घरी त्यांच्या, अशा स्वरूपाचं भक्तीमय वातावरण गावात आहे. अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन सोहळा, हरिपाठ, दीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी अक्षयतृतीयेचा लक्ष्मीनारायण देवतेचा मुख्य उत्सव, सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यत मुंबईचे कीर्तनकार हभप रुपेश सुर्वे यांचे पुष्पवृष्टीवर आधारित सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांना होणार आहे. गेले पाच दिवस सकाळ, संध्याकाळ महाप्रसाद असून, मंगळवारी रात्री ८ वा. श्री चा पालखी सोहळा, याच वेळेत रात्री ९ वा. रात्रीचा महाप्रसाद, ९.३० वाजता महिला संगीत भजन स्पर्धा असा हरिनाम संकीर्तनाचा गजर दिवसभर अक्षयतृतीयेच्या दिवशी चालणार आहे. १० मे ललिताचे कीर्तनाचे, ११ मे रोजी श्रीसत्य नारायण महापूजेने या उत्सवाची सांगता होणार आहे.
सबंध परिसरात एक जागृत देवस्थान म्हणून लक्ष्मी नारायण देवाचा लौकिक आहे. १९८९ च्या महापुरात या गावाचे खलाशी अरबी समुद्रात वादळात अडकले. सर्वांनी त्यांच्या परतण्याची आशा सोडून दिलेली असताना लक्ष्मीनारायणाच्या प्रती असलेल्या श्रद्धाभावभक्तीने गावातील मासेमारी करणारे खलाशी सुखरूप परतले. त्यामुळे लक्ष्मीनारायणावर त्यांची असीम श्रध्दा आहे. श्री लक्ष्मी नारायण मंडळ जिते व ग्रामस्थ मंडळ जिते यांच्यावतीने आठवडाभर या उत्सवाचं पावित्र्य राखले जाते.