खड्ड्यांनी घेतला व्यावसायिकाचा बळी
By Admin | Updated: October 26, 2016 02:00 IST2016-10-26T02:00:06+5:302016-10-26T02:00:06+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांनी रोहा शहरातील व्यावसायिक जितेंद्र सोळंकी यांचा बळी घेतला आहे.

खड्ड्यांनी घेतला व्यावसायिकाचा बळी
रोहा : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांनी रोहा शहरातील व्यावसायिक जितेंद्र सोळंकी यांचा बळी घेतला आहे. सोमवारी रात्री झालेल्या अपघातात जितेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी हिना गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हे वृत्त समजताच रोहा शहरावर शोककळा पसरली, तर रोहा बाजारपेठही मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती.
जितेंद्र हे रोहा शहरातील एक मनमिळावू आणि मोकळ्या मनाचे दिलदार व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना परिचित होते. जितेंद्र यांच्या पश्चात हेली (७) आणि पिनाक (३) ही दोन अपत्ये, आई, वडील, विवाहित भाऊ, बहीण आहेत. त्यांचे वर्गमित्र असलेले रोह्याचे आमदार अवधूत तटकरे, अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष समीर शेडगे आदी उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)