Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभरात अद्यापही चर्चेत आहे. यासंदर्भात आता पुढील न्यायालयीन लढाई सुरू आहे. संतोष देशमुख यांची हत्या किती निर्घृण पद्धतीने करण्यात आली, याची माहिती समोर येताच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. संतोष देशमुख प्रकरणावरून आजही आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता न्याय मिळावा, यासाठी देशमुख कुटुंब लढा देत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख, बंधू धनंजय देशमुख रायगडावर गेले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांवर जेव्हा अन्याय झाला, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना न्याय मिळवून दिला. तसेच ज्यांनी असे अन्याय करणारे कृत्य केले, त्यांना कठोर शिक्षा दिली. आजही महाराष्ट्रात माझ्या वडिलांची हत्या झाली, तशी अनेकांची हत्या झालेली आहे. या सरकारकडून मला हीच अपेक्षा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जशी शिक्षा देण्याची प्रथा होती तीच प्रथा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी वापरली तर राज्यातील गुन्हे थांबतील, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा
गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालणार आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे, असे वैभवी देशमुख यांनी सांगितले. प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की, त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. आम्ही संकल्प करणार आहोत. इथे आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ज्या मावळ्यांना, ज्या प्रजेला न्याय द्यायचे काम त्यांनी केले. तसेच या शासनाने केले पाहिजे. महाराष्ट्रात एक उदाहरण घालून द्यायला हवे की, इथे गुन्हेगारीला कुणीही साथ देणार नाही. गुन्हेगारी कायमची कशी संपवली जाईल. याकडे लक्ष दिले पाहिजे. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बंधू धनंजय देशमुख यांनी केली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगड वर पार पडतोय. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज राज्यातील तीन ते चार लाख शिवभक्त गडावर दाखल झालेत. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. याचा उत्साह गडावर पाहायला मिळतोय.