मुकुंद रांजणे
माथेरान : वीकेंड, थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानमध्ये आले आहेत. दस्तुरी नाका येथून ई-रिक्षांनी त्यांचा प्रवास सुखकारक होत आहे. मात्र, ई-रिक्षांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
ई-रिक्षांची व्यवहार्यता सिद्ध करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर येथे २० ई-रिक्षा सेवा देत आहेत. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची गैरसोय दूर झाली आहे. आता पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा आहे. सध्या २० ई-रिक्षा सुरू आहेत. शाळा सुरू असतील तर विद्यार्थ्यांना वीसपैकी पंधरा रिक्षा सेवा देत असतात. उर्वरित पाच रिक्षा प्रवासी सेवा देतात. मात्र, या फेऱ्या कमी पडत आहेत.
ई-रिक्षांची सुविधा कौतुकास्पद आहे. पण, इथे एवढे पर्यटक येतात त्या तुलनेत रिक्षा खूपच कमी आहेत. शासनाने आणखी ई-रिक्षा सुरू केल्यास पर्यटकांचा वेळ वाचेल. पर्यटकांची संख्याही वाढेल. - निरंजन हातनोलकर, पर्यटक, मुंबई
गर्दीच्या वेळी पर्यटकांना ई-रिक्षाच्या रांगेचे नियोजन मी करत असतो. या रिक्षांची संख्या कमी असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना तासनतास ई-रिक्षाची वाट पाहावी लागते. यासाठी सनियंत्रण समितीने त्यांची संख्या वाढवावी. पायलट प्रोजेक्टचा कालावधी पूर्ण झाला आहे. - जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते, माथेरान