पाघोळी विहीर योजना
By Admin | Updated: July 25, 2015 04:00 IST2015-07-25T04:00:27+5:302015-07-25T04:00:27+5:30
रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य टप्पा - दोन अंतर्गत पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना आखण्यात आली आहे

पाघोळी विहीर योजना
आविष्कार देसाई,अलिबाग
रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य टप्पा - दोन अंतर्गत पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना आखण्यात आली आहे. पेण तालुक्यातील ३४ गावांसाठी सुमारे तीन कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची १०० टक्के मदत जागतिक बँक करणार आहे. त्यामुळे ६०० पाघोळी विहिरींच्या माध्यमातून सुमारे पाच हजार नागरिकांना शाश्वत पिण्याचे पाणी वर्षभरासाठी उपलब्ध होणार आहे.
पाणीटंचाईची सर्वाधिक झळ ही पेण तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करोडो रुपयांचा दरवर्षी चुराडा होतो. हजारो मिलीमीटर पावसाची नोंद होऊनही जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यापासून पाणीटंचाईला सुरुवात होते. पाणी ही जीवनावश्यक गरज असल्याने सरकार प्रशासनामार्फत करोडो रुपये खर्च करून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करते. मात्र हे दुष्टचक्र सातत्याने सुरूच असून ते भेदण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. जलस्वराज्य टप्पा क्रमांक - दोन अंतर्गत गाव, वाड्या आणि वस्त्यांवर पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकारने पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी जागतिक बँक १०० टक्के अर्थसहाय्य करणार आहे.
जलस्वराज्य टप्पा क्रमांक - दोन अंतर्गत एकूण ६३ गावांचा समावेश आहे. त्यापैकी पेण तालुक्यातील ३४ गावांचा समावेश पाघोळी विहीर योजनेसाठी करण्यात आला आहे. त्यानंतर इतर टंचाईग्रस्त तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ही योजना उत्तम असून वर्षभर पिण्याचे पाणी याद्वारे उपलब्ध होईल, असे साळुंखे यांनी सांगितले.