श्रीवर्धनमधील १६ ग्रामसेवक रजेवर
By Admin | Updated: November 18, 2016 03:30 IST2016-11-18T03:30:21+5:302016-11-18T03:30:21+5:30
तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणारे १६ ग्रामसेवक गुरुवारी १७ नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसाठी

श्रीवर्धनमधील १६ ग्रामसेवक रजेवर
श्रीवर्धन : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणारे १६ ग्रामसेवक गुरुवारी १७ नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसाठी सामुदायिक रजेवर गेले आहेत. तलाठ्यापाठोपाठ ग्रामसेवकांनीही ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे.
श्रीवर्धन तालुक्यात ४ ग्रामसेवक कंत्राटी आहेत, दोघाजणांना निलंबित करण्यात आले आहे. ग्रामसेवकांवरील चुकीच्या पद्धतीने केलेली कारवाई रद्द करण्यात यावी, कंत्राटी कामगारांचा ३ वर्षे सेवाकाळ नियमित होण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा आदी १५ मागण्यांसंदर्भात राजव्यापी संपात श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामसेवक सामील आहेत. आपल्याकडील चाव्या पंचायत समितीमधील गटविकास अधिकाऱ्यांकडे देऊन हे ग्रामसेवक ‘काम बंद’ आंदोलनात उतरले आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा ग्रामसेवक युनियनने दिला आहे.
ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरला श्रीवर्धन पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. यापूर्वी ग्रामसेवकांनी विविध आंदोलने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्याची दखल राज्य सरकारने न घेतल्यामुळे ग्रामसेवकांना आपल्या विविध मागण्यांसाठी झगडावे लागत आहे. मात्र, आश्वासनापलीकडे काहीही पदरात न पडल्यामुळे ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला, त्यामुळे मागण्या मान्य झाल्याशिवाय कामगार हजर होणार नाहीत, असा इशारा ग्रामसेवक युनियनने दिला आहे. (वार्ताहर)
कर्जतमध्ये ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन
कर्जत : तालुक्यातील तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागत असतात त्यामुळे या दोन कार्यालयांत नेहमीच नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. बुधवारपासून महसूल खात्यातील तलाठी सामूहिक रजेवर गेले आहेत आणि गुरुवारपासून पंचायत समितीच्या ग्रामसेवकांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यातील दोन्ही मुख्य कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्याने सर्व सामान्य नागरिकांची कामे रखडणार आहेत. १५ न्याय्य प्रलंबित मागण्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी ७ नोव्हेंबरपासून राज्यभर ग्रामसेवकांनी असहकार पुकारला होता.